गरजू विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग नेटवर्क

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी
80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत 2047’ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘जेन-झी’ (युवा पिढी) आणि विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. तरुणांसाठी त्यांनी केलेली सर्वांत मोठी घोषणा म्हणजे ‘फ्री कोचिंग नेटवर्क’. याअंतर्गत देशातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक मोठे डिजिटल आणि ऑन-ग्राउंड नेटवर्क तयार केले जात आहे, जिथे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी टॉप फॅकल्टी आणि स्टडी मटेरियल मोफत उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे आता छोट्या शहरांतील आणि गावांतील तरुणांना महागड्या कोचिंग फीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही.
भारताला केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक न ठेवता ‘ग्लोबल इनोव्हेशन हब’ बनवण्यासाठी पंतप्रधानांनी 1 लाख कोटी रुपयांच्या ‘रिसर्च आणि इनोव्हेशन’ फंडाची घोषणा केली.
यामध्ये जेन-झीच्या स्टार्टअप्सचे मोठे योगदान असून, सध्या देशात 2.5 लाखांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. अवघे 28 वर्षे सरासरी वय असलेल्या तरुणांनी स्वतःचे सॅटेलाईट लाँच करण्यासारखी मोठी कामगिरी केली असून, या नव्या फंडामुळे युवा पिढीला संशोधनाच्या आणि विकासाच्या आणखी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. परदेशात शिक्षणाचे स्वप्न पाहणार्‍या जेन-झीसाठी मोदींनी मोठी घोषणा केली ती म्हणजे भारतातच मिळणारी ’ग्लोबल डिग्री’. जगातील नामांकित परदेशी विद्यापीठे आता भारतात येत असल्यामुळे तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि ग्लोबल एक्सपोजर मिळवण्यासाठी लाखो-करोडो रुपये खर्चून परदेशात जाण्याची गरज उरणार नाही. याशिवाय, गेल्या 10-12 वर्षांत देशात सुरू झालेली 650 नवी विद्यापीठे, वैद्यकीय जागांमध्ये झालेली वाढ आणि जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा यामुळे युवा पिढीला घरबसल्या नवीन स्किल्स शिकण्याची व डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडले जाण्याची मोठी संधी मिळत आहे.

’शक्तीची सप्तधारा’ संकल्प

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाचा भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच ’शक्तीची सप्तधारा’ (सात संकल्प) जाहीर केली. या सात धारांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग पॉवर (उत्पादन क्षेत्र), कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवकल्पना (एआय, 6-जी), गती शक्ती (हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी), संरक्षण शक्ती (सायबर आणि संरक्षण आत्मनिर्भरता), ग्रीन-ब्लू इकॉनॉमी (हरित ऊर्जा व रोजगार) आणि भारताची सॉफ्ट पॉवर (योग आणि आयुर्वेद) यांचा समावेश आहे. या सप्तधारांच्या माध्यमातून देशाच्या युवाशक्तीला राष्ट्रनिर्माणाशी जोडून भारताला नव्या उंचीवर नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

 

Free Coaching Network for Needy Students

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *