घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने नाराजी 

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने नाराजी

लासलगाव : समीर पठाण

सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरात आणखी ५० रुपयांची वाढ करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातील महिलांसह सर्वसामान्य जनतेत नाराजीचा सूर दिसून येत आहे.
पूर्वी १४.२ किलोग्राम गॅस सिलेंडर ला १०६३.५०/- रु मोजावे लागत होते आता ५० रुपयांच्या दरवाढीमुळे त्याच सिलेंडर ला १११३.५०/- रु मोजावे लागत आहे.तसेच पूर्वी १९ किलोग्राम व्यावसायिक सिलेंडरला १७५३/- रुपये मोजावे लागत होते आता ३५० रुपयांच्या दरवाढीमुळे त्याच सिलेंडर ल २१०३/- रुपये मोजावे लागत आहे.

लासलगाव सारख्या ग्रामीण भागात इंधनासाठी केरोसीन व लाकडे मिळत नसल्याने शेगडी व चूल केव्हाच कालबाह्य झाली आहे.गॅस सिलिंडर वापरणे सोयीचे असल्याने सर्वसाधारण व्यक्तीच्या घरातही गॅसचा वापर केला जातो.लासलगाव शहरात दोन गॅस एजन्सी आहेत.या परिसरात बहुतांश नागरिक स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात.ग्रामीण भागात वृक्षतोडीवर नियंत्रण मिळावे.महिलांना चुलीपासून होणाऱ्या धुरापासून मुक्ती मिळावी.त्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्‍शन या परिसरात मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आले.आज घडीला लासलगाव व परिसरात गॅसधारकांची संख्या मोठया प्रमाणात आहे. दरम्यान दरवेळी होणाऱ्या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांवर मोठा बोजा पडत असून सर्वासामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

चहा टपरी,खाद्यपदार्थ विक्रेते व रस्त्यावर लहानमोठी दुकाने चालवून रोजगार करणाऱ्या व्यावसायिकांना सुद्धा या गॅस दरवाढीचा फटका बसला आहे.सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जिवनावर थेट परिणाम करणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.या भाववाढीमुळे शेतकरी,शेतमजुर,व्यापारी व सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असुन जनतेच्या त्रासात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. या व अशा शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे जनता अधिकच त्रस्त झाली आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याच प्रकार असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करत आहे

सरकारने महिलांसाठी उज्ज्वला योजना काढली होती ती कशासाठी असा प्रश्‍न पडत आहे.तुम्ही दरवेळेस गॅस सिलेंडर चे दर वाढवणार असाल तर तुमच्या योजनांचा काय फायदा? सरकार अजून किती सर्व सामान्य जनतेला पिळून खाणार आहे याचे उत्तरे सरकारने द्यावे.परिसरातील खेड्यातील काही महिलांनी गॅस परवडत नसल्याने चूल पेटवण्यास सुरुवात केली आहे असे असेल तर सरकारच्या योजना चुलीतच गेल्या असे म्हणावे लागेल

शीतल बबन शिंदे
सरपंच थेटाळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

 

सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देत नाही.
कांद्याच्या दरात घसरण सुरू असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्यात काम कमी आणि महागाई जास्त असा सरकारचा कारभार सुरु आहे.त्यात सरकारने घरगुती गॅसचा दर वाढवला हे अत्यंत चुकीचे आहे.सरकार शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या पोटावरच पाय आणणार असेल तर त्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न पडला आहे.शेतकरी व शेतमजुरांचे जगणे कठीण झाले असुन जनतेच्या त्रासात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे.

सविता संतोष राजोळे
महिला शेतकरी टाकळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *