गुढीपाडव्याला श्रीखंड का खावे?

गुढीपाडव्याला घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र, तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पूजा केली  जाते.  बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते. असे म्हटले जाते की, जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी. म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो. या दिवशी गुढीला श्रीखंड पुरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंडबद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडाला रसाला किंवा शिखरिणी म्हणतात.

श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो, असे सांगितले जाते.

आता गुढीपाडव्याला श्रीखंडच का खायचे?
उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायनाप्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही, ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय.
श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात, यामुळे श्रीखंड बाधते..

आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे?
प्रथम छान दही लावावे. ते कधीही आंबट असू नये. चांगले दही लागल्यानंतर सुती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासांसाठी टांगून ठेवावे. जे काही जलरहित दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो.
आयुर्वेदिक श्रीखंडामध्ये चक्का हा खडीसाखर (मिक्सरला बारीक करून घेणे)बरोबर फेटायचा आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो. श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूपही टाकलेले असते. नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळले जाते.वरून थोडं केसर दूध घाला म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते.
वरील विधीवरून हे लक्षात येते की, श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे. त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही.

थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेऊन हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख, समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *