गर्भवतींपासून राहिले दूर ‘माहेरघर’!

वर्षभरात अवघ्या 20 महिलांनी घेतला लाभ; जूनअखेर सातशे प्रसूती

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील माहेरघर योजनेंंतर्गत एप्रिल ते जून 2026 या तीन महिन्यांत निवडलेल्या ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकूण सातशे प्रसूती झाल्या. मात्र, या कालावधीत फक्त वीस महिलांनी माहेरघर योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.
आदिवासी भागात रस्त्यांची समस्या, खंडित दूरध्वनी, नेटवर्क नाही, तसेच वाहतूक करण्यास अडचण आदी कारणांमुळे राज्य शासनाने 2010-11 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माहेरघर योजना सुरू केली आहे.
गेल्या वर्षभरात एकूण सातशे प्रसूती झाल्या असून, केवळ 20 महिलांनी माहेरघर योजनेचा लाभ घेतला आहे. माहेरघर योजनेबाबत योग्य जनजागृती तसेच गर्भवती महिलांची (रोजगार बुडेल या भीतीने) प्रसूतीसाठी लवकर प्रसूतिगृहात दाखल होण्याबाबत उदासीनता, आपल्या आरोग्याबाबत कमालीचे दुर्लक्ष आदी कारणांमुळे या योजनेंंतर्गत प्रसूतिगृहात दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे समोर
आले आहे.
माहेरघर योजनेंंतर्गत एप्रिलमध्ये 348, मे-168 आणि जूनमध्ये 184 प्रसूतींची नोंद झाली आहे. एकूण सातशे प्रसूती झाल्या. मात्र, लाभार्थींची संख्या एप्रिलमध्ये सहा, मे- सात आणि जूनमध्ये सात अशी एकूण 20 इतकीच
राहिली आहे.
तालुकानिहाय पाहता पेठ तालुक्यातील जोगमोडी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचोहोळ या दोन केंद्रांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी नऊ लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला. उर्वरित बहुतांश केंद्रांमध्ये लाभार्थींची संख्या शून्य असल्याचे अहवालात नमूद आहे. प्रसूतींच्या संख्येत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचोहोळ (44), सुरगाणा तालुक्यातील पळसन (38), पांगरणे (33) आणि बुबळी (30) या केंद्रांमध्ये सर्वाधिक प्रसूती झाल्या. देवळा-खर्डा (26), सुरगाणा-मानखेड (21), नांदुरी (20), बोरगाव (20) आणि शिरसगाव (20) येथेही प्रसूतींची नोंद झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात बहुतांश आदिवासी लोकसंख्या ही डोंगराळ पाड्यांमध्ये वास्तव्यास असते. आदिवासी पाड्यांत अनेक ठिकाणी रस्ते, वाहनाची व्यवस्था नसते. पावसाळ्यात अनेक रस्ते बंद होतात. कच्च्या रस्त्यांची दुरवस्था होते. महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था वेळेवर उपलब्ध होईल याची शाश्वती नसते. माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढण्यास ही महत्त्वाची कारणे ठरतात.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मोठ्या प्रमाणावर प्रसूती होत असतानाही माहेरघर योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनेबाबत जनजागृती वाढविण्याची गरज आहे.

आदिवासी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालयात माहेरघर योजना सुरू करण्यात आली आहे. अति जोखमीची, गुंतागुंत टाळण्यासाठी गर्भवतींंनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पंधरा दिवस आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे.
– डॉ. हर्षल नेहते, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

 

‘Maherghar’ remains out of reach for pregnant women!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *