*काय करावे?*
डिजीटल तंत्रज्ञान आणि उपकरणे आपल्या हितासाठी बनवली गेली. परंतु गेल्या काही वर्षांत त्याचा भस्मासुर झाला आहे. कोविड काळातील लाकडाऊनमुळे या आगीत तेल ओतले गेले. आता वेळ आली आहे गांभीर्याने विचार करत यावर नियंत्रण कसे मिळवता येईल. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक घटकाने हे प्रयत्न करायला हवेत.
आपल्याला डिजिटल युगाचे उपभोक्ता नव्हे स्वामी व्हायचे आहे. एकमेकांशी संभाषणासाठी प्रत्यक्ष फोन आणि भेटी गाठी करा. सोशल मिडिया टाळा. पुस्तके वाचा. स्क्रीनवर वाचण्याची सवय टाळा. खेळायचे असेल तर बाहेर जाऊन खेळा. पारंपारिक बुद्धिबळ, कॅरम बैठे खेळ आहेतच.
मनोरंजनासाठी गाणी ऐका, वाचन करा, TV बघा. लहान मूल घरात असताना ॲमेझॉन, नेटफ्लिक्स वरील सिरीयल आणि चित्रपट बघताना काळजी घ्या. सेक्स, हिंसाचार, अश्लील भाषा यांचा मुलांच्या नकळत्या वयात मनावर परिणाम होणार नाही ही जबाबदारी पालकांची आहे . Sitting is the new smoking. बसणे टाळा. चालत रहा. घरातली कामे स्वतः करा. मुलांना त्यात समाविष्ट करून घ्या. गाडीचा वापर कमी करा.
काही वेळ सकाळी आणि संध्याकाळी घरातील सर्व सदस्य एकत्र राहतील असे सर्वांचे वेळापत्रक ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबत वेळ घालवणे बोलणे ,ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दारू आणि इतर व्यसने ही मानसिक ताण कमी करण्याची, झोप येण्याची योग्य साधने नाहीत हे ध्यानात घ्या . धूम्रपान आणि अंमली पदार्थांपासून दूर रहा. मुलांशी या विषयावर मोकळे बोला. त्यांना मार्गदर्शन करा. हे विषय बोलण्यातून टाळून ते दूर राहणार नाहीत.
प्रेम प्रकरणे , त्यातून येणारे डिप्रेशन यावर देखील घरामध्ये मुक्त संवाद करा. विचार आणि भावना दडपून टाकू नका. योग्य संवाद मदत करतो .
या सर्व बाबतीत जेथे जेथे आपले प्रयत्न कमी पडत असतील तेथे मानसोपचार तज्ञांची मदत घ्या. औषधोपचार आणि समुपदेशन प्रभावीरित्या सर्व मानसिक आजारांवर मात करण्यास मदत करतात. मानसिक आजार आणि त्यावरील औषध उपचार याबद्दलचे गैरसमज दूर करा. विज्ञानाच्या अथक संशोधनाचे फलित म्हणून आज अनेक प्रभावी आणि सुरक्षित औषधे आपल्याकडे उपलब्ध आहेत. काॅग्नेटीव बिहेवियर थेरपी, रॅशनल इमोटीव बिहेवियर थेरेपी अशा जागतिक मान्यता प्राप्त मानसोपचार पद्धती उपलब्ध आहेत त्यांचा आपण लाभ घ्यायला हवा.
21 वे शतक मानसिक आजार मोठ्या प्रमाणात घेऊन आले आहे. त्यांकडे दुर्लक्ष करणे ही मोठी घोडचूक ठरेल.
तंत्रज्ञान हे हल्ली जेवणानंतरच्या आईस्क्रीम सारखे नाही राहिले . ते भाजी पोळी सारखे झाले आहे. आपण त्याला टाळू शकत नाही. तो आपल्या जीवनाचा नियमित भाग असणार आहे. रशियामध्ये किंवा युरोपमध्ये शिकणारे विद्यार्थी, दुबईमध्ये नोकरी करत असलेले व्यावसायिक या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज आमच्याशी संपर्क साधतात. आणि उपचार घेऊ शकतात. तसे यातून चांगले काय ते आपल्याला निवडता आले पाहिजे.
आपल्या जीवनातील कोणतही समस्या असो, शारीरिक आजार असो किंवा मानसिक आजार – जितके लवकर आपण सुयोग्य मार्गाने त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू तितक्या प्रभावीपणे आणि वेळीच आपण त्यांवर मात करू शकतो हे सूत्र लक्षात घ्या.
भविष्य काय?
ज्याप्रकारे डिजिटलीकरण, धावपळीचे आयुष्य, व्यावसायिक यशामागे पळणे, व्यसने, अनियमित दिनचर्या गेल्या काही काळात फोफावले आहेत
हे असेच चालू राहिले तर मानसिक आजार ज्या वेगाने वाढत आहेत ते अधिकच वेगाने वाढत राहतील. बऱ्याचदा इतर शारीरिक आजारांप्रमाणे जीवघेणे नसले तरी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनावर मोठे दुष्परिणाम करण्याची क्षमता ते ठेवतात. मला वाटते आपल्यापैकी कोणालाही हे नको आहे. भौतिक सुखाबरोबरच आनंद, आरोग्य, समाधान आपल्याला हवे आहे.