पाच कोटींच्या निधीमुळे साधू-महंतांमध्ये समाधान

सिंहस्थासाठी तातडीने निधी देऊन विकासकामांना गती देण्याची अपेक्षा

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रत्येक आखाड्यासाठी सेवासुविधांच्या विकासकामाला 5 कोटी रुपयांचा भरीव निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या आखाड्यांच्या साधूंच्या समन्वय बैठकीत केली. याबाबत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनी सरकारचे आभार मानले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाला प्रारंभ झाला तेव्हापासून असलेली आखाड्यांच्या साधूंची मागणी शासनाने मान्य केली आहे. याबाबत साधू-महंत यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रत्येक आखाड्याला 5 कोटींची विकासकामे आणि आश्रम मठ कुटीया यांना विकासकामांचा स्वतंत्र निधी मिळावा, अशी मागणी महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी वेळोवेळी केली होती.
कुंभमेळा नियोजनासाठी येथे भेट देणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये मागणी लावून धरली होती. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक घेण्याचा आग्रहदेखील धरला होता. अखेर 13 एप्रिल 2026 ला मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमवेत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील सर्व 13 आखाड्यांचे प्रत्येकी दोन साधू प्रतिनिधी यांच्यासमवेत विचारविनियम बैठक घेण्यात आली. या बैठकीला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येक आखाड्याला 5 कोटी रुपये आणि छोट्या संस्थांना प्रत्येकी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आलेे.
आखाड्याचे वीजबिल प्राधिकरणाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. शासकीय कामांसाठी आखाड्याची जमीन अधिग्रहीत केल्यास त्यांना मोबदला अथवा जमीन देण्याची घोषणा झाली. याबाबत साधू-महंतांनी समाधान व्यक्त केले आहे. त्र्यंबकेश्वर येथे 10 शैव साधूंचे आखाडे आहेत. शासनाने जाहीर केलेल्या 5 कोटी रुपयांच्या मदतीतून आखाड्यांना सेवासुविधांची विकासकामे करणे शक्य होणार आहे. आश्रम मठ कुटीया यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. केवळ भक्तांनी केलेल्या दानधर्मावर सर्व सेवा होत असतात. त्यांना कायमस्वरूपी व्यवस्था उभी करण्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात सुमारे 100 च्या आसपास मठ आश्रम आहेत. सर्व आखाड्यांना 50 कोटी आणि सर्व आश्रमांना 15 कोटी असे 65 कोटी रुपये शासनाने देऊ केले आहेत. यामधून सिंहस्थ कुंभमेळा होत आहे.

शासनाने आमच्या मागणीप्रमाणे प्रत्येक आखाड्याला 5 कोटी रुपये व छोट्या संस्थांना 15 लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कुंभमेळामंत्री यांसह सर्व मंत्रिमंडळाचे आणि अधिकार्‍यांचे आभारी आहोत. विकासकामांसाठी वेळ कमी आहे. यापुढे कामांना गती देण्यासाठी निधी वर्ग करणे यांसह सर्व शासकीय सोपस्कार वेगाने पूर्ण करावेत.
– महंत शंकरानंद सररवती महाराज,
अध्यक्ष, श्री पंचायती तपोनिधी आनंद आखाडा

Sadhus and mahants are satisfied with the fund of five crores.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *