नाशिकनगरीत पालखीचे भक्तिभावाने स्वागत; वरुणराजानेही केला जलाभिषेक
सिडको : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा साक्षीदार असलेला विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा बुधवारी (दि. 1 जुलै) नाशिक शहरात अत्यंत भक्तिमय, पारंपरिक आणि आध्यात्मिक वातावरणात दाखल झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे ज्येष्ठ बंधू आणि नाथ संप्रदायाचे आद्यगुरू असलेल्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी भाविक, वारकरी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पालखी शहरात प्रवेश करताच रिमझिम पावसाने हजेरी लावली. जणू वरुणराजानेही संतांच्या पालखीवर जलाभिषेक करून आपल्या भक्तीची सेवा अर्पण केली, अशी भावना उपस्थित वारकरी व्यक्त करीत होते. टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर, भगव्या पताका आणि तुळशीवृंदावनासह चालणार्या वारकर्यांमुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामात दंग झाला होता.
नाशिक महानगरपालिका, संत निवृत्तिनाथ महाराज सामाजिक सेवा संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनीषा खत्री, महापौर हिमगौरी आहेर-आडके,उपमहापौर विलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, माजी आमदार बाळासाहेब सानप, अॅड. नितीन ठाकरे, हभप रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास महाराज, भक्तिधामचे स्वामी संविदानंद सरस्वती, पालखीचे मानकरी हभप मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, हभप देहूकर महाराज, हभप बाळासाहेब काकड, संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप राहुल महाराज साळुंखे, पालखीप्रमुख माधवदास महाराज राठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापौर हिमगौरी आडके यांनी पालखी मार्गाचे रुंदीकरण करून वारकर्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करण्यात येतील, तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर संत निवृत्तिनाथ महाराज प्रवेशद्वार उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि वारी ही नाशिकची आध्यात्मिक ओळख असून, या परंपरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
वारकरी संप्रदायातील वारी ही केवळ यात्रा नसून समता, भक्ती, सेवा आणि समाजप्रबोधनाची अखंड परंपरा आहे. संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याने ही संतपरंपरा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.
पालखी मार्गावर सर्वत्र ज्ञानोबा-तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. मान्यवरांनी बळीराजावर वरुणराजाची कृपा राहो, नद्या-नाले तुडुंब भरून वाहोत, तसेच येणारा सिंहस्थ कुंभमेळा आणि आषाढीवारी निर्विघ्न पार पडो, अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. श्रद्धा, अध्यात्म, संतपरंपरा व सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम अनुभवायला देणारा हा पालखी सोहळा नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरला.
Saint Nivruttinath set out to meet Lord Vitthal.