दत्तनगर-अंबडदरम्यान पुलाअभावी कसरत

जीव मुठीत धरून कामगार जातात कामावर

सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मधील दत्तनगर येथून अंबड औद्योगिक वसाहतीत जाणार्‍या हजारो कामगारांना पुलाअभावी दररोज जीव धोक्यात घालून कामावर जावे लागत आहे. सलग पावसामुळे बुधवारी नाल्याला मोठा पूर आल्याने ही समस्या पुन्हा ऐरणीवर आली. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि संसाराचा गाडा ओढण्यासाठी दिवसरात्र कष्ट करणार्‍या कामगारांना कंपनीत कामावर वेळेत पोहोचण्यासाठी अक्षरशः जीव मुठीत धरून नाला पार करण्याची वेळ आली.
दत्तनगर परिसरात वास्तव्यास असलेले अनेक महिला व पुरुष कामगार अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. या परिसरातून औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. मात्र, नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे धोकादायक बनतो. बुधवारी नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक कामगारांनी एका खासगी कंपनीच्या संरक्षक भिंतीवरून तोल सांभाळत नाला ओलांडला. थोडीशी चूक झाली असती तर थेट पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती होती. जीवावर उदार होऊन कामगारांनी हा मार्ग पार केल्याचे चित्र अस्वस्थ करणारे होते.
रक्ताचे पाणी करून उद्योगांना उत्पादन देणार्‍या कामगारांसाठी सुरक्षित रस्ता किंवा पूल उभारण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. कामावर वेळेत पोहोचणे आणि संध्याकाळी सुखरूप घरी परतणे, एवढीच अपेक्षा असलेल्या कामगारांना दरवर्षी पावसाळ्यात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या नाल्यावर पूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तत्कालीन नगरसेवक नितीन दातीर यांनी महासभेत हा प्रश्न उपस्थित करून आंदोलनही केले होते. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
एखादी मोठी दुर्घटना घडून निष्पाप कामगाराचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पावसाळा सुरू असतानाच या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी पूल उभारून कामगारांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा, अशी मागणी दत्तनगर परिसरातील नागरिक, कामगार आणि स्थानिकांकडून होत आहे.

Struggle between Dattanagar and Ambad due to the lack of a bridge.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *