गोड गळ्याचे गायक : येसुदास

आज, 10 जानेवारी 2026 हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक आणि संगीतकार येसुदास यांचा 86 वाढदिवस. हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या गायकांनी आपल्या मधुर आवाजाने ठसा उमटवला त्यात येसुदास हे एक महत्त्वाचे नाव. 10 जानेवारी 1940 रोजी एका मल्याळम ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या येसुदास यांचे वडील मल्याळम् भाषेतील शास्त्रीय संगीतकार होते.
त्यांच्या वडिलांकडूनच त्यांनी संगीतकलेचे प्राथमिक धडे गिरवले. वयाच्या सातव्या वर्षी कोची येथील स्थानिक स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी सुवर्णपदक जिंकले. कन्नड, मल्याळम्, तेलुगू आणि तामिळ या दक्षिण भारतातील सर्व भाषांत त्यांनी गाणी गायली. तिथे त्यांनी गायलेली सर्वच गाणी हिट झाली. त्यांच्या आवाजाची परदेशातील रसिकांनादेखील भुरळ पडली. 1965 साली रशियन सरकारने त्यांना गाण्यासाठी खास आमंत्रण दिले होते. गोड, मखमली आवाज ही येसुदास यांची ओळख बनली.
त्यांच्या गोड आणि मखमली आवाजाची कीर्ती हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचली नसती तरच नवल. संगीतकार सलील चौधरी यांनी त्यांना दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांच्या ’छोटीशी बात’ या चित्रपटासाठी एक गाणे गायला लावले. त्यांच्या आवाजाने बासू चॅटर्जी हेही प्रभावित झाले. त्यांनी त्यांना त्यांच्याच चित्रपटात गाण्याची ऑफर दिली. 1970 पासून त्यांनी हिंदी गाणी गायला सुरवात केली. जानेमन जानेमन तेरे दो नयन… या गाण्यानंतर शांत, सज्जन दिसणारा अमोल पालेकर यांच्यासाठी येसुदास यांचाच आवाज सूट होतो, असे गणित बॉलिवूडने बांधले.
येसुदास यांच्या मधुर आवाजामुळे अनेक संगीतकार त्यांना त्यांच्यासाठी गाण्याची गळ घालू लागले. मात्र, येसुदास हे गाण्याची निवड मात्र विचारपूर्वक करत. येसुदास यांनी फक्त अमोल पालेकर यांच्यासाठीच नाही, तर अमिताभ बच्चन व जितेंद्र यांच्यासाठीही गाणी गायली. त्यांनी रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, खय्याम, राजकमल, सलील चौधरी या संगीतकारांसमवेत अनेक सदाबहार हिंदी चित्रपटांतील गाणी गायली. त्यांनी जवळपास 45 हजार गाणी गायली आहेत. सध्याच्या पद्धतीची गाणी त्यांना आवडत नाहीत म्हणून त्यांनी बर्‍याच वर्षांपासून गाणे गायचे थांबवले आहे. येसुदास यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांना 2002 साली पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार दिला आहे, तर केरळ सरकारने त्यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम स्वाती पुरस्कारम या पुरस्काराने गौरविले आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. येसुदास यांनी काही दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांची निर्मितीही केली आहे. येसुदास यांनी गायलेली ’गोरी तेरा गाव बडा प्यारा’, ’सुरमई अखियों मे’, ’दिल के तुकडे तुकडे करके’, ’जानेमन जानेमन तेरे दो नयन’, ’चांद जैसे मुखडे पे’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. येसुदास यांचे चाहते केवळ भारतातच आहेत असे नव्हे, जगभर त्यांचे चाहते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *