भारतीय संस्कृतीत वर्षभर सण-उत्सवांची रेलचेल असते. सण-उत्सव काळात अनेक धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. श्रावण महिन्याप्रमाणेच माघ – फाल्गुन हे महिनेदेखील सण-उत्सवाचेच असतात. श्री गजानन महाराज प्रगट दिन, रामदास नवमी, महाशिवरात्री, शिवजयंती असे एकामागे एक सण-उत्सव साजरे होत असतात. थंडी जाऊन उन्हाचा चटका जाणवत असतानाच, होळी, धूलिवंदन, रंगपंचमी सण साजरे केले जातात. सध्या शहरात सण-उत्सवाचे वातावरण आहे.
गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त नाशिक शहर तसेच सिडको, इंदिरानगर, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या उपनगरांमध्येही गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘जय गजानन’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सिडकोमधील वीर सावरकर चौकात श्री संत गजानन महाराजांचा 148 वा प्रगट दिन भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जय गजानन, श्री गजानन आणि गण गण गणात बोते या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पहाटे पाच वाजता अभिषेक व महापूजा करण्यात आली. परिसरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. गंधर्वनगरीतील श्री गजानन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. रवींद्र अवधूत, कडू महाराज यांचे गजानन विजयग्रंथ पारायण झाले. सकाळी शोभायात्रा, श्री गजानन विजयग्रंथाचे पारायण, रुद्रपूजा व माधवदास राठी महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. तर जाचक मळा येथील गजानन महाराज मंदिरात सकाळी मूर्तीस महाभिषेक, महापूजा करण्यात आली. तसेच गण गण गणात बोते महामंत्राचा जप, गजानन विजयग्रंथाचे पारायण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
राज्य बालनाट्य स्पर्धेत
‘मुंग्यांची दुनिया’ प्रथम
महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या नाशिक, धुळे व अहिल्यानगर केंद्राचा निकाल जाहीर झाला असून, अहिल्यानगर येथील नाट्य आराधना संस्थेच्या ‘मुंग्यांची दुनिया’ या बालनाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. या स्पर्धेत माधवराव बोरस्ते जनता विद्यालय, ओझर यांच्या ‘रामा रे’ या नाटकास द्वितीय पारितोषिक, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या ‘ठोंब्या ठोंबीची गोष्ट’ या नाटकास तृतीय पारितोषिक, अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या सेल या नाटकास चतुर्थ पारितोषिक, तर हेल्पी फाउंडेशन, लळींग यांच्या अजब लोठ्यांची महान गोष्ट या नाटकास पाचवे पारितोषिक जाहीर झाले आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक समर्थ वाघ (रामा रे) आणि नुरिया सय्यद (ठोंब्या ठोंबीची गोष्ट) यांना देण्यात आले. नाशिक, धुळे व अहिल्यानगर येथे पार पडलेल्या या
स्पर्धेत एकूण 60 बालनाट्य प्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून अभय अंजीकर, योगेश शुक्ल आणि क्षिप्रा देशमुख यांनी काम पाहिले.
दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत
‘गुरुदक्षिणा’ विजेते
महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य
स्पर्धेत नाशिकच्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संस्थेच्या ‘गुरुदक्षिणा’ नाटकाने प्रथम पारितोषिकासह पाच बक्षिसे पटकावली. महाराष्ट्र समाजसेवा संघाच्या चक्रला द्वितीय, तर प्रबोधिनी ट्रस्टच्या मोल-अनमोल नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले. राज्यस्तरीय
स्पर्धेत पहिली तिन्ही पारितोषिके नाशिकच्या संस्थांनी पटकावली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बुधवारी (दि. 11) स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. तो असा : दिग्दर्शन ः प्रथम : वर्षा साळुंखे (गुरुदक्षिणा), द्वितीय : धनंजय वाबळे (चक्र), तृतीय : कांचन इप्पर (मोल अनमोल); प्रकाशयोजना : प्रथम कृतार्थ कन्सारा (चक्र), द्वितीय : ललित श्रीवास्तव (गुरुदक्षिणा), तृतीय : विनोद राठोड (तमसो मा ज्योतिर्गमय); नेपथ्य ः प्रथमः सरोज आहेर (मोल अनमोल), द्वितीय : लता नायक (चिमणी उड, कावळा उड, माणूस उड?), तृतीय : समर्थ आगाशे (विठ्ठलास आमंत्रण).
जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धेला
उत्स्फूर्त प्रतिसाद
डे केअर सेंटर शाळेत कवी आनंद
जोर्वेकर व बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात झाली. यास साहित्यिक स्वानंद बेदरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला जयंत ठोंबरे, नंदकिशोर ठोंबरे, अलका कुलकर्णी, अंजना भंडारी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सचिव अंजली पाटील, अनिल भंडारी, अजय ब्रह्मेचा, वासंती पाठक उपस्थित होते. स्पर्धेत पेठ, त्र्यंबकेश्वर, येवला, कळवण, सिन्नर, चांदवड, मालेगाव, दिंडोरी या तालुक्यांमधील एक हजार 151 विद्यार्थी सहभागी झाले. परीक्षक म्हणून मंजुषा पांगारकर, शुभांगी माळी, नेहा देशपांडे, कुमारी गायत्री वाणी, आरती डिंगोरे, यशश्री रहाळकर, अंजना भंडारी, नंदकिशोर ठोंबरे, चिदानंद फाळके, विलास पंचभाई, हिंगणे यांनी काम पाहिले.
वेदमूर्ती दंडक्रम विक्रमादित्य
देवव्रत रेखे यांचा सन्मान
काशी येथे वेदमूर्ती दंडक्रम विक्रमादित्य देवव्रत रेखे यांनी 19 व्या वर्षी पन्नास दिवसांत शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेतील ऋचांचे विक्रमी पारायण केले. नाशिककरांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. ब्रह्मर्षी गणेश्वरशास्त्री द्रविड यांच्या हस्ते पगडी, महावस्त्र, सन्मानपत्र व 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. मंचावर संयोजक विजय व जयंत भातांबरेकर आणि परिवार तसेच वेदमूर्ती महेश रेखे, शांतारामशास्त्री भानोसे, मकरंद महाराज, नीलेश केदार, देवेंद्र गडकर, प्रकाश प्रभुणे, अहिताग्नी आंबेकर, सूर्यकांत राखे आदी उपस्थित होते.
ब्रह्मर्षी दत्तमहाराज कविश्वर
यांचा जयंती उत्सव
दत्तपरंपरेतील सत्विक तपस्वी ज्ञानशक्तीचे प्रसारक, ब्रह्मर्षी विद्यावाचस्पती दत्तमहाराज कविश्वर यांचा जयंती उत्सव गुरुदक्षिणा सभागृहात झाला. सकाळी सात वाजेपासून दिवसभर विविध कार्यक्रम झाले. या जन्मोत्सवात दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचे जपानुष्ठान, चैतन्यमयी सुमती बापट यांचे श्री गजानन विजयग्रंथाचे मुखोद्गत डिजिटल पारायण, आदित्य संप्रदायी भागवताचार्य, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. योगेश्वरबुवा उपासनी महाराज, अंमळनेर यांचे कीर्तन झाले. उमा टोणपे यांनी सूत्रसंचालन केले.
स्वराज फाउंडेशनतर्फे
उगम सांस्कृतिक महोत्सव
स्वराज फाउंडेशनतर्फे आयोजित उगम सांस्कृतिक महोत्सवात माझे रंगमंच, माझे साहित्य या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले की, सन 1985 मध्ये मी केलेले नाटक आणि आजचे नाटक यात काहीच फरक नाही, याचे वाईट वाटते. आपण अजूनही बॉक्स सेटमध्येच रमलो आहोत.
नाटकात नवनवे प्रयोग होत नसल्याने आपण नाट्य क्षेत्रात खूप मागे आहोत, फ्रावशी टाउन व फ्रावशी अकॅडमी येथे या महोत्सवाचा समारोप झाला. यात मांजरेकर यांच्यासह प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे, नाटककार शफाअत खान सहभागी झाले होते. अभिनेते किशोर कदम यांनी या कलाकारांशी संवाद साधला. युगंधर देशपांडे लिखित व दिग्दर्शित बॅकस्टेजयाला नाटकातून रंगभूमीच्या पडद्यामागील कलाकारांचं आयुष्य
मांडण्यात आले.
सायकलिंगद्वारे रस्ता सुरक्षेचा जागर
शहरातील शरणपूर रोडवरील पोलिस कवायत मैदानावर गेल्या रविवारी सकाळी किड्स सायक्लोथॉन रंगली. त्यात बाराशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायकलिंग, आरोग्य अन् रस्ता सुरक्षेचा जागर केला.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नाशिक शहर पोलिस आयुक्तालय व नाशिक महापालिका, तसेच फिट इंडियाच्या संडे ऑन सायकलच्या सहकार्याने आयोजित या अनोख्या उपक्रमाचा मुख्य उद्देश लहान मुलांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करणे, आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे, तसेच रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे हा होता.
The city of Nashik is filled with cheers of ‘Jai Gajanan’…
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…