दिवस पहिला शाळेचा, ध्यास धरावा शिक्षणाचा…

नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 हे आज, 15 जून 2026 रोजी सुरू होत आहे.शाळा आरंभाच्या दिवशी प्रत्येक गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात गुलाबपुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात येणार आहे. प्रभातफेरी काढून शाळांत प्रवेशोत्सव साजरा करण्यात येईल.
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुलामुलींना पाठ्यपुस्तकाचे आणि गणवेशाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन ते संग्रही ठेवले जाणार आहेत. दुपारच्या सुटीत शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना गोड पदार्थ दिला जाणार आहे.
अशा प्रकारे प्रत्येक शाळेत पहिल्या दिवशी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत आणि पहिल्या दिवसापासून अभ्यासक्रम शिकवायला प्रारंभ केला जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांना नवी उमेद व अभ्यास करण्याची प्रेरणा देणारे असते. जरी तो शाळेचा पहिला दिवस असला तरीही तो दिवस शिक्षणाची कास व ध्यास धरण्याची प्रेरणा देण्याचे काम करतो. एकेकाळी प्रत्येक गावात, समाजात व शाळेत चांगले शैक्षणिक वातावरण होते.त्या चांगल्या व निकोप शैक्षणिक वातावरणात अनेक पिढ्यांनी एकाग्रतेने शिक्षण शिकून जीवनाचे ध्येय गाठले व त्यामुळे त्यांच्या जीवनाचे सोने झाले आहे. नवीन शैक्षणिक वर्षात नवीन वर्ग, नवीन मित्र, नवीन पुस्तके, नवीन कपडे असायचे आणि नवीन अभ्यासक्रम असायचा. सगळं कसं नवनवीन असायचे. त्यामुळे मन हरकून जायचे आणि मन लावून शिक्षण शिकण्याची प्रेरणा मिळायची.
आजचा काळ हा माहिती तंत्रज्ञानाचा काळ आहे. संगणक, लॅपटॉप, मोबाइल व एआय तंत्रज्ञान यांनी मानवी जीवनात आमूलाग्र बदल केला आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे मानवजातीला लाभलेले एक वरदान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण शिकता येईल, जीवनात आमूलाग्र बदल करता येईल आणि जीवनाचे सोने करून घेता येईल. पण नवीन पिढीचे दुर्दैव असे की, मोबाइल आणि संगणकाचा सदुपयोग करण्याऐवजी दुरुपयोग जास्त केला जात आहे. वाईट संगतीत राहिल्याने वाईट कृत्ये केली जात आहेत. शिक्षण एकाग्रतेने शिकण्याऐवजी थातूरमातूर व दुर्लक्षितपणे शिक्षणाचे धडे गिरवले जात आहेत. असे शिक्षण कुचकामी ठरते आणि जीवनाला दिशाहीन करते. म्हणून शिक्षण शिकायचे तर चांगल्या पद्धतीने शिकावे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने उच्च शिक्षणाचे शिखर गाठले आणि स्वतःचा आदर्श निर्माण केला त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी विद्याव्यासंग जपला पाहिजे. ते संपूर्ण जगात आदर्श विद्यार्थी आणि ज्ञानवंत विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. हा लक्षणीय आदर्श लक्षात घेऊन राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता तो दिवस 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे मिसाइल मॅन, थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अद्वितीय कार्य लक्षात घेऊन त्यांचा जन्म दिन 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
ही बाब अतिशय प्रेरणादायी आहे. म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन उच्च शिक्षणात प्रावीण्य मिळवावे. भारतातील सर्व विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने खूप खूप शिकावे आणि स्वतःचे, आई-वडिलांचे, गावाचे, शाळेचे व देशाचे नाव मोठे करावे.शाळा आरंभ दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

The first day of school—let us set our hearts on education…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *