शासन पोहोचणार आता आखाड्यांच्या दारी

साधू-महंतांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी फेरी

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 नियोजन करताना साधूंच्या आखाड्यांसोबत चर्चा करण्यासाठी व त्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शुकवारी (दि. 29) प्रशासनाचे अधिकारी सर्व आखाड्यांना भेटी देणार आहेत. तशा आशयाचे पत्र सर्व दहा आखाड्यांना रवाना झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे शैव साधूंचे दहा आखाडे आहेत. त्यात नागा साधूंचे सात आखाडे आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा पर्वकाल साधण्यासाठी हजारोंच्या संख्येने साधू, महंत आणि लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी उपस्थित राहतील. त्यांच्यासाठी सरकारने अग्रकमाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त ठरणार आहे. सिंहस्थाचे नियोजन करतांना केवळ सुशोभीकरण करणे यावर भर दिल्यास प्रत्यक्ष गर्दीच्या कालावधीत आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता राहील.
याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे त्र्यंबकेश्वर येथील भौगोलिक परिस्थिती आणि भरपावसाळ्यात येणारा कुंभमेळा याचा विचार करता येथे नियोजनाची कसोटी लागणार आहे. साधू आखाड्यांना भेटी देणार्‍या पथकात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यासह नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आणखी काही पदाधिकारी, सदस्य असतील, असे सांगण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वर येथे आखाड्यांंपासून साधूंच्या मिरवणुका निघतात. त्या कुशावर्तावर स्नानाला येतात व तेथून त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जातात. येथील वेगळेपण पाहता कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर मंदिर यांच्याबाबत सूक्ष्म नियोजनाची गरज आहे. बदलते जीवनमान, प्रवासाच्या उपलब्ध सुविधा यांसह अलीकडच्या कालावधीत समाजमनाचा भक्तिमार्गाकडे वाढलेला कल पाहता आगामी सिंहस्थात भक्तांची संख्या कित्येकपटीने वाढलेली असेल. कुंभमेळ्याला येताना सिंहस्थ कुंभस्नान, दर्शन याव्यतिरिक्त आखाड्यांत भेट देणे, नागा साधूंच्या जीवनक्रमाबाबत असलेले औत्सुक्य व साधू,
महंत यांच्या दर्शनाचा लाभ घेणे यासाठी भाविक येथे अधिक काळ रेंगाळतील. शहराच्या सर्व बाजूंनी असलेल्या आखाड्यांना भेटी देतील.

योग्य दिशेने टाकलेले पाऊल

कुंभमेळ्याच्या निमित्ताने आलेले आचार्य, तपस्वी, महात्मा त्यांच्या शिबिरस्थळांवर जातील. या सर्वांचा विचार करून नियोजन होणे आवश्यक आहे. वाढत्या गर्दीला मूलभूत सुविधा पुरवण्याचे आव्हान शासनासमोर आहे. शासनाने आखाड्यांच्या भेटीगाठी घेण्यास केलेली सुरुवात हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. आखाड्यांच्या साधू- महंतांशी चर्चा करत त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्यास पूर्वनियोजन करण्यास फायदा होणार आहे. याबाबत साधू-महंतांनीदेखील स्वागत केले आहे. कुंभमेळ्यात शासनाने साधू आखाड्यांंना मूलभूत सुविधा देण्यासाठी हात आखडता घेऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *