संपादकीय

मुस्लिम धमीर्र्यांचा पवित्र रमजान महिना

रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा असा महिना आहे. या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्त्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद स.अ.स. यांचा सर्वार्ंत प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो. 19 फेब्रुवारीपासून पवित्र रमजान महिन्याला सुरवात झाली आहे.

इस्लामिक महिने चान्द्रिक कालगणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरवातदेखील चंद्रदर्शनाने होते. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे. म्हणूनच त्याच्या दुसर्‍या दिवसापासून मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नतचे दार उघडले जातात व जहन्नम (नरक)चेे दार बंद केले जाते आणि त्यानंतर सूचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे त्यांनी पुढे व्हावे. आणि जे लोक वाईट कृत्य करणारे आहेत त्यांनी त्यापासून लांब थांबावे. या महिन्यातील प्रमुख गोष्टी : 1. रोजा, 2. नमाज, तराविहची विशेष नमाज, 3. शब ए कद्रची रात्र 4. कुरआन 5. जकातुल फित्र.
1) रोजा (उपवास)
रोजा म्हणजे पहाटे सूर्योदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात
अन्नपाण्याचा एक कणसुद्धा खाणे-पिणे वर्ज्य असते. असे पूर्ण महिनाभर 30 दिवस चालते.रोजा यामागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्षे चालणार्‍या मशिनला, गाडीला वर्षातून एकदा का होईना सर्व्हिसिंग करून घेतो. जेणेकरून गाडीचे, मशिनचे आयुष्य वाढते तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्नप्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीररूपी मशिन सर्व्हिसिंग होऊन आणखी चांगले कार्य करावे म्हणून रोजा केला जातो. यामुळे शरीराची अन्नप्रक्रिया आणखी चांगल्या प्रकारे कार्य करते. व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते. रोजा ठेवलेल्यांच्या पोटात काही नसल्याने पोटात एक प्रकारची ऊर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिकरीत्या कमी होते. म्हणजेच रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंताला गरिबीची जाण करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवण न करता एकवेळ जेवून उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेदनांची जाण श्रीमंताला या रोजामुळे होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात. श्रीमंत लोकांच्या मनात गरिबांबद्दल आदर, दया, आस्था व करुणेची भावना या रोजामुळे निर्माण होते. याचा परिणाम अन्नधान्य, दानधर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पारड्यात पडून बर्‍याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो, तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजादारांना या रमजानच्या रोजामुळे होते. रोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती, रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवू शकतो अशा व्यक्ती, प्रवासी, कमीत कमी सात वर्षे, अकरा वर्षे वयाआतील लहान बालके यांना माफ करण्यात आला आहे.
2) तराविह (रात्रीची विशेष नमाज)
मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजरची नमाज, दुपारी जोहरची नमाज, दुपारी असरची नमाज (सूर्यास्ताच्या अगोदर), सायंकाळी मगरीबची नमाज आणि रात्री इशाची नमाज, अशा एकूण पाच नमाज आहेत.
नमाज हाही एकप्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. पवित्र कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. आपल्याला नमाजची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते, ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहू अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब सर्वजण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाजव्यतिरिक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविहची विशेष अशी नमाज पूर्ण महिनाभर होते. विविध मस्जिदीत या तराविहची विशेष नमाजमध्ये रोज पवित्र कुरआनचे पठण केले जाते.
3) शब-ए-कद्र (पवित्र रात्र):
सर्वांत पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री पवित्र कुरआनचे अवतरण सुरू झाले. या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो, इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते. किंबहुना इतर दिवसांच्या एक हजार महिन्यांच्या तुलनेतदेखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे. शब-ए-कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे. या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्त्व आहे, जो कोणी खर्‍या भक्तिभावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्चाताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली तर नक्कीच गुन्ह्यांची माफी मिळतेे.
4) पवित्र कुरआन :
इस्लाम धर्माचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद स. अ. यांच्यावर अल्लाहकडून उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय, जो समस्त मानवजातीला अनुसरून मार्गदर्शक आहे. रमजान महिन्याच्या पवित्र शब-ए-कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरित झाला. रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले, जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरित करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी 30 खंड, 114 अध्यायांत करण्यात आली आहे. यात 6000 पेक्षाही जास्त आयत आणि विशेष म्हणजे 1000 पेक्षा जास्त आयत आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.
कुरआन हा पवित्र ग्रंथ असून, ता कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस)पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः अल्लाहने स्वीकारलेली आहे. याच प्रमुख कारणामुळे आज चौदाशे-साडेचौदाशे वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या कानामात्रात कोणताही बदल झालेला नाही आणि ईन्शाअल्लाह कयामतपर्यंत होणारही नाही.
5) जकातुल फित्र (दानधर्म) :
हा या महिन्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. जकातुल फित्र म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत, सधन आणि कमीत कमी चांगली आर्थिक परिस्थिती असणार्‍या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे 2.5 किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाखीची परिस्थिती असणार्‍या अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाचे असते. जेणेकरून त्या गरीब कुटुंबालादेखील ईदच्या त्योहारामध्ये सामील होता यावे. थोडक्यात, जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न (सोने-चांदीचे दागिने, स्थावर मालमत्ता, बँक बॅलन्स, शेतीतील उत्पन्न) हे एकूण 20 लाख बनत असल्यास त्यास 2.5% प्रमाणे रुपये 50,000 हे जकात देणे बंधनकारक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटुंबं दररोज उपाशी झोपतात. अशा परिस्थितीत या जकातुल फित्रचे महत्त्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकातुल फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एकेका कुटुंबाकडे इतके जमा होते की, त्या कुटुंबाची वर्षभराची जेवणाची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.
वरील सर्व माहितीवरून आपल्या असे लक्षात येते की, रमजान महिन्यातील रोजा म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही, तर रोजा, तराविहची विशेष नमाज, शब-ए-कद्र (कुरआन अवतरित झालेली रात्र), कुरआन, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे.
जी व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल तीच खर्‍या अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असूनदेखील वाईट कृत्य, निंदानालस्ती, शिवीगाळ, दारू, जुगार या अनैतिक गोष्टींपासून वाचत नसेल तर प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजेदाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.
ईद-उल-फित्र (रमजान ईद) ः
महिनाभराच्या उपवासानंतर चंद्रदर्शन होते.त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मुस्लिमबांधव यात पुरुष, महिला, लहानमोठे सर्वच जण सुवासिक तेल, अत्तर (इत्तर) लावून नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिदमध्ये जातात. या विशेष
नमाजला ईद-उल-फितरची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिमबांधव ईदच्या नमाजीनंतर एकमेकांना आलिंगन (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुर्मा-शेवयांचा गोड आहार घेतला जातो.

The holy month of Ramadan for Muslims

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

1 hour ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

1 hour ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

1 hour ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

1 hour ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

2 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

2 hours ago