शालिवाहन शके संवत्सरातला मार्गशीर्ष मास हा अनुक्रमे नववा महिना आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले आहे. मार्गशीर्ष मासात ऋतुकाळ हेमंत हा वातावरणात प्रचंड गारवा देणारा. रात्र दीर्घ स्वरूपाची. शुक्राची चांदणी आसमंत उजळून टाकणारी. पहाट वारा अंगाला बोचणारा. आदिदेव भास्कराच्या कोवळी सुवर्ण किरणांची आतुरता विलक्षण बल प्रदान करणारी. मार्गशीर्ष महिन्याची निसर्गदत्त अनुभूती ज्याप्रमाणे आपल्यासकट प्राणिमात्राला होत असते. अशा मार्गशीर्ष मासाचा गौरव भगवान श्रीकृष्णाने केला आहे. मासांना मार्गशीर्षम् अशा शब्दांत भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने गौरव केला.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मार्गशीर्ष हे माझेच रूप आहे.
शास्त्र पुराणानुसार, मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो.
हिंदू संस्कृतीत पारंपरिक कालगणनेत प्रत्येक महिन्याचे एक वैशिष्ट्य व गुणदर्शन बघायला मिळते. शिवाय वैदिक पुराणाच्या संदर्भानुसार बघितले असता, बारा महिन्यांच्या एकेक अधिदेवता आहेत. पैकी मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता भगवान श्रीकृष्ण आहे. आध्यात्मिक, पारमार्थिक, वैचारिक साधना बळकटीसाठी व्रतवैकल्याचा सुकाळ या मासात दिसतो. श्रद्धा, भक्तिभाव, पारमार्थिक उत्कर्ष वृद्धिगंत व्हावा, या हेतूने शास्त्रकारांनी काही धार्मिक नियमांचा पायंडा पाडलेला आहे. मानवी जीवनात शाश्वत सुख, संयमित जीवनासाठी ध्यान, मनन, चिंतन, योग, नामस्मरण यांसारखे मार्ग दर्शविले आहेत. ज्याप्रमाणे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची गरज असते. अगदी तसेच मानवी दश इंद्रियांना संयमित ठेवण्यासाठी आध्यात्मिक मार्गाशिवाय तरणोपाय नाहीच.
पौराणिक संदर्भानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देव दिवाळी असते. पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष मासाच्या पहिल्या तिथीला सतयुगाचा प्रारंभ झाला. महर्षी कश्यप ऋषींनी काश्मीरसारख्या सुंदर प्रदेशाची निर्मितीही केली. मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाची षड्त्रोत्सवास प्रारंभ होतो. जेजुरी गडावर चंपाषष्ठीला मोठा उत्सव साजरा केला जातो. अखिल विश्वाचे कल्याण आणि मार्गदर्शक ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्या मुखाद्वारे अर्जुनाला कुरुक्षेत्रावर ज्ञानामृत पाजले. तो दिवस मोक्षदा एकादशीचा. तिलाच गीता जयंती असेही म्हणतात. त्रिगुणात्मक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती म्हणून मानला जातो. मानवी जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करणार्या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण, चिंतन, मननाचा उत्तम काळ म्हणजे मार्गशीर्ष होय. या मासाच्या सप्ताहातील गुरुवार श्रीलक्ष्मीच्या वैभवाची कृपाछाया कायम राहावी म्हणून व्रत-वैकल्यात स्त्रियांचा मोठा सहभाग असतो. शारीरिक पुष्टतेसाठी उपवास, मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा, ज्ञानार्जनासाठी अनमोल ग्रंथांचे चिंतन, पठण, मनन, तर आध्यात्मिक साधनेसाठी ध्यानधारणा जप, नामस्मरणाचा महामार्ग भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी पुरेसा ठरतो.
एकंदरीत शास्त्राने दर्शविलेेला मार्ग कुठल्याही विकारी, नकारात्मक, तामसी वृत्तींपासून मानवास अलिप्त ठेवतो. म्हणून संपूर्ण मार्गशीर्ष मास हा उत्कर्षाचा पर्वणी काळ आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…