काळ्याकुट्ट अंधारात आदिवासींचा
पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
सुरगाणा : नासिर मणियार
आदिवासी भागातील पाझर स्रोत आटले, आणि इकडे सरकारलाही पाझर फुटेना अशा पाणी टंचाईच्या भीषण संकटात सापडलेला आदिवासी समाज कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी दाही दिशा पायपीट करीत आहे पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेणारा उर्वरित महाराष्ट्र जेंव्हा ढेकर देऊन गादीवर पहुडण्याची तयारी करीत असतो तेंव्हा ही आदिवासी माय भगिनी काळ्या कुट्ट अंधारात काटे कुटे, झुडपे, तुडवत, दगड धोंड्यांना ठेचाळत डोक्यावर रिकामी घागर घेऊन पाण्याच्या शोधात भटकत असते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सुरगाण्यातील आदिवासी पाड्यावरचे हे भीषण वास्तव आहे. धरणांचा जिल्हा म्हणून शेखी मिरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात जिथून पाणी पाझरते, ओढ्या नाल्यामधून प्रवाहित होऊन धरणात साठते, त्या आदिवासी भागालाच पाण्याची तीव्र टंचाई भासते हे वास्तव नेहमीचेच या पाणी टंचाईने कोरडा पडलेल्या घशातून धरण उशाशी कोरड घशाशी या शब्दांचे उच्चारण करण्याचे त्राणही या माता भगिनींमधे उरले नाहीत. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यावर असलेली भीषण पाणी टंचाई पाहून हृदय पिलवटून जाते. डोक्यावर, कमरेवर हंडी, कळशी हातात बॅटरी घेऊन, पाण्याच्या शोधात निघालेली आदिवासी पाड्यावरची वृद्ध महिला हे चित्र पाहून जिल्हा व्यवस्थेला कुठलीच दया येत नाही. हे पाहून मन अस्वस्थ होते. आहे सुरगाणा तालुक्यातील मोरडा अवघ्या 600 लोकवस्तीचा पाडा मात्र पिण्यासाठी पाणीच नसल्यानं महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र भटकावं लागतं. दिवसभर काबाडकष्ट करायचं आणि नंतर पाण्याचा शोध घ्यायचा एवढाच दिनक्रम . गावातील विहिरीने तळ गाठलाय. तासनतास वेळ घालवल्यानंतर एखादं दुसरा हंडा भरतो, म्हणूनच डोंगर दऱ्याची काट्याकुट्याची वाट तुडवीत या महिलांचा अनवाणी प्रवास सुरु होतो. त्यातच हिंस्र पशूंची भीती दूर करण्यासाठी गावातील तरुण कोणी टेंभे घेऊन तर कोणी मोबाईल फ्लॅशचा उपयोग करून महिलांची पाठराखण करतांना दिसतात. या भटकंतीत एखादा झरा सापडला तर विश्व प्रदक्षिणा पूर्ण केल्याचे समाधान या माय माऊलीच्या चेहऱ्यावर झळकताना दिसते. मग महिलांची रांग लागते.वर्षोनुवर्षे हीच दुरावस्था ललाटी लेवून ही पायपीट सुरु आहे. केवळ माणूसच नाही तर मुकी जनावरेही या पाणी टंचाईला बळी पडत आहेत. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीत येताय आश्वासन देऊन निघून जातात पाणी टंचाई तशीच पुढील पाच वर्षाची प्रतीक्षा तशीच रहाते. लग्न करून गावात सून म्हणून आलेल्या नवं विवाहितेला चुडा उतरण्याच्या आधी डोक्यावर हंडा घेऊन अनवाणी दाही दिशा भटकंती करीत पाण्याचा झरा शोधण्याची वेळ येते. हा केवळ मोरडा या एकाच गावाचा प्रश्न नाही तर आजूबाजूच्या गळवड, शिरीषपाडा, दांडीची बारी, म्हैसमाळ, देवळा, धुरापाडा, खुंटविहीर, मोहपाडा आशा अनेक गावची समस्या आहे गावातील लेकींना लहानपणापासूनच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, सुनांना लग्न झाल्यापासून पाण्याच्या खेपा मारायला जुंपावे लागते, म्हणूनच पेयजल योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी होत असली तरी सरकारला अजूनही पाझर फुटत नाही हेच लोकशाहीचे काळे कुट्ट वास्तव आहे.
नाशिक: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साधू महंत यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन नाशिक : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…
मनमाड : आमिन शेख मनमाड जे जंक्शन स्थानक असुन या ठिकाणी रोज काहींना काही घटना…
फॅशन वीक म्हणजे फक्त डिझायनर कपडे, कॅमेर्यांचे फ्लॅश आणि रॅम्पवॉक एवढ्यावरच मर्यादित नसते, तर ती…
1. आरामदायक फुटवेअर निवडा उन्हाळ्यात पायांना घाम येणे आणि दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. म्हणून अशा…
अहिल्यादेवी होळकर म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनात असणारी ती प्रतिमा की, ज्यात सात्त्विकता, सुशीलता, शीतलता, पवित्रता,…
View Comments