चंदनपुरी खंडोबा यात्रोत्सवात भक्तांची लाट

राज्यभरातून भाविकांची हजेरी; ’येळकोट येळकोट’चा जयघोष

मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे खंडेराव महाराज, म्हाळसाई व बाणाई मातेच्या मंदिरात सुरू असलेल्या यात्रोत्सवास मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर गेल्या शनिवारी (दि.3) यात्रोत्सवाचा प्रारंभ झाला. पंधरा दिवस चालणार्‍या या यात्रेत लाखो भाविक दाखल होत आहेत, अशी माहिती सरपंच विनोद शेलार यांनी दिली.
जेजुरीनंतर महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे महत्त्वाचे खंडोबा क्षेत्र म्हणून चंदनपुरी ओळखले जाते. उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबा महाराजांचे हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे दरवर्षी पौष पौर्णिमेपासून यात्रोत्सव भरतो. खंडेराव महाराजांची दुसरी पत्नी बानू मातेचे माहेर म्हणून चंदनपुरीला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
यात्रोत्सवाचा शुभारंभ राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक खंडेराव महाराजांची महापूजा करून वाघ्या-मुरळीसह तळी भरत केला. यावेळी सरपंच विनोद शेलार, उपसरपंच कैलास शेलार, पोलीसपाटील राणी गायकवाड, ग्रामपंचायत पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
मालेगाव तालुक्यासह नाशिक, खान्देशातील धुळे, शिरपूर, कसमादे परिसर, तसेच गुजरातमधूनही मोठ्या संख्येने भाविक येथे येत आहेत. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागत आहेत. गेल्या शुक्रवार, शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. सुरुवातीच्या दोन दिवसांतच सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले. गर्दी नियंत्रणासाठी स्टीलच्या जाळीचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत, महसूल प्रशासन व पोलीस विभागाने व्यापक व्यवस्था केली आहे. यात्राकाळात नियमित पाणीपुरवठा, 40 स्वच्छता कर्मचार्‍यांमार्फत दररोज स्वच्छता, कीटकनाशक फवारणी व पथदीपांची सोय करण्यात आली आहे. सुरक्षा व वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 29 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जात आहे.
यात्रोत्सव शांततेत, शिस्तीत व भक्तिभावात सुरू असून, पुढील आठवड्यात या यात्रेची सांगता होणार आहे, अशी माहिती सरपंच शेलार यांनी दिली.

श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यासह परराज्यातून लाखो मल्हारभक्त येथे येत आहेत.त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ग्रामपंचायत, महसूल प्रशासन व पोलीस विभागाच्या समन्वयाने सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले आहे. भाविकांनी शिस्त पाळून शांततेत व भक्तिभावाने दर्शन घ्यावे. यात्रोत्सव यशस्वी, सुरक्षित आणि आनंदात पार पडावा, हीच खंडोबा महाराजचरणी प्रार्थना आहे.
– विनोद शेलार, सरपंच, चंदनपुरी

पालखीची भव्य मिरवणूक

यात्रेच्या पहिल्याच दिवशी मानाच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ’सदानंदाचा येळकोट’ या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भंडारा व खोबर्‍याच्या उधळणीने मंदिर परिसर पिवळ्या सोनेरी रंगात न्हाऊन निघाला. भाविक तळी भरणे, नवस
फेडणे, जागरण गोंधळ, वाघ्या-मुरळींचे कार्यक्रम, अशा विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होत आहेत.

पाचशेहून अधिक विविध दुकाने

यात्रोत्सवामुळे चंदनपुरी व मालेगाव परिसरात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. येथे 500 हून अधिक दुकाने थाटण्यात आली आहेत. पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थ, हॉटेल, खेळणी, मनोरंजनाची साधने, जादूचे प्रयोग आदी दुकाने भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Wave of devotees at Chandanpuri Khandoba Yatrotsav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *