पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असून, मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सध्या बाजार समितीचा कारभार प्रशासकांच्या हाती असल्यामुळे धोरणात्मक व दैनंदिन निर्णयप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे. परिणामी, विविध कर आणि शुल्क भरूनही शेतकर्यांना कचरा, चिखल आणि असुविधांचा सामना करावा लागत आहे.
बाजार समिती परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात
शेतमालाची मोठी आवक होते. मात्र,कचर्याच्या नियमित विल्हेवाटअभावी भाजीपाल्याचा कुजलेला भाग, प्लास्टिकचा साठा आणि साचलेले दूषित पाणी यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे वाहने चालवणे तर दूरच, पायी चालणेही मुश्कील झाले आहे. याशिवाय अपुरी व
अस्वच्छ स्वच्छतागृहे तसेच पिण्याच्या पाण्याचा तुटवडा यामुळे शेतमाल विक्रीसाठी तासन्तास थांबणार्या शेतकर्यांचे मोठे हाल होत आहेत.कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्यांच्या अर्थकारणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळणे हा शेतकर्यांचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने कागदी कारभारातून बाहेर पडून बाजार समिती परिसरातील अस्वच्छता दूर करावी, रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य शेतकर्यांमधून होत आहे.
Widespread filth plagues the market committee; administration turns a blind eye.