‘जल जीवन’ मिशनसाठी 20,500 कोटींचा निधी

दीड वर्षाच्या संघर्षाचे फलित; पाणीपुरवठा ठेकेदारांच्या आंदोलनाला यश

नाशिक : प्रतिनिधी
जल जीवन मिशनसह पाणीपुरवठा विभागातील रखडलेल्या कामांसाठी राज्य शासनाने 20 हजार 558.68 कोटींच्या अतिरिक्त निधीला मान्यता दिल्याने गेल्या दीड वर्षापासून थकीत बिलांसाठी आंदोलन व पाठपुरावा करणार्‍या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना आणि नाशिक जिल्हा गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या आंदोलनाला अंशतः यश आल्याची भावना संघटनेने व्यक्त केली. मात्र, शासननिर्णय झाला असला, तरी प्रत्यक्ष निधी अद्याप वितरित झालेला नसल्याने तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दि. 10 जुलै रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार जल जीवन मिशनच्या 74 हजार 548.22 कोटींच्या बृहत् आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 36 हजार 998.59 कोटी खर्च झाले आहेत. उर्वरित 37 हजार 549.63 कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून निधी वेळेत न मिळाल्यास राज्य शासन स्वतः निधी उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार 2026-27 या आर्थिक वर्षात 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक भौतिक प्रगती झालेल्या जल जीवन मिशनच्या योजनांसाठी 17 हजार 958 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 20 हजार 558.68 कोटींच्या अतिरिक्त राज्य निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जल जीवन मिशन 2.0 ची अंमलबजावणी गतीने पूर्ण करण्यास मदत होणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सांगितले की, प्रधान सचिव, जल जीवन मिशनचे मिशन संचालक, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठका, तसेच कल्याण आणि कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनांसह राज्यभर करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण आंदोलन व पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला आहे.
या निर्णयाबद्दल संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ तसेच सर्व आमदारांचे आभार मानले आहेत.
मात्र, शासननिर्णय असूनही प्रत्यक्ष निधीचे वितरण अद्याप झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासूनची थकीत बिले तातडीने अदा करून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी निधी त्वरित वितरित करावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बाळासाहेब जाधव यांनी दिला आहे. या पाठपुराव्यात संघटनेचे उपाध्यक्ष किशोर जामदार, मनोज खाडे, अजय यादव, बिपिन कोरगावकर, पी. एन. पाटील, महेश घाडगे, किशोर थोटे, दिलीप सावंत, जितेंद्र पाटील, जुबेर इनामदार, विश्वनाथ जयस्वाल, नरेंद्र पोळ आदींनी सहभाग घेतला.

₹20,500 crore fund for ‘Jal Jeevan’ Mission

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *