राज्यस्तरीय समितीकडून बेघर निवारा कामकाजाचा आढावा

 

 

 

केंद्रांची पाहणी, मनपाच्या कामगिरीचे कौतुक

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

महानगरपालिका कार्यक्षेत्रात “दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत “शहरी बेघरांना निवारा” या घटकाच्या कामकाजाचा आढावा शनिवारी ( दि. 4) उज्ज्वल उके यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय निवारा संनियंत्रण समितीने घेतला.

 

यावेळी मनपा मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उज्ज्वल उके आणि समिती सदस्य महेश कांबळे यांचे स्वागत केले. मनपाच्या शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त करुणा डहाळे यांनी प्रास्ताविक करून शहरी बेघर निवारा या घटकाचे सादरीकरण केले.

 

यात बेघरांचे सर्वेक्षणानुसार नोंद झालेल्या 894 बेघरांना निवारा उपलब्ध करून देणेकामी मनपाचे मालकीचे 4 जागांवर एकूण 649 बेघर क्षमतेचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले.. अशाप्रकारे सर्वेक्षणानुसार आढळलेल्या सर्व 894 बेघर क्षमतेसाठी निवारा केंद्राची उपलब्धता करून देणारी नाशिक महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. याबाबत समितीद्वारे देखील नाशिक महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.. तसेच  तपोवन येथील स्वामी विवेकानंद बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापन श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांचे मार्फत विनामूल्य करण्यात येत आहे. याकामी पुढील पाच वर्षासाठी बेघर निवारा केंद्र चालविण्यास देण्यात आलेले आहे,व असा उपक्रम राबविणारी देखील नाशिक मनपा महाराष्ट्रात एकमेव महापालिका ठरली आहे. तसेच निवारा केंद्रात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, बेघरांचे  केंद्रातील आगामी याबाबत याबाबत माहिती सादर केली.. माननीय आयुक्त यांनी मनपाच्या रुग्णालयामध्ये बेघरांवर उपचार केले जातील, त्यांना तिथे समुपदेशन तसंच मानसोपचार तज्ञांचं मार्गदर्शन मिळेल, अशी माहिती दिली. तसेच बेघरांचे रेशनकार्ड काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, त्र्यंबकेश्वर, संचलित तपोवन येथील स्वामी विवेकानंद बेघर निवारा केंद्राचे स्वामी विश्वरुपानंद यांनी बेघरांच्या आरोग्याच्या समस्येवर प्रकाश टाकला. आतापर्यंत 20 जणांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले. काही बेघर गंभीर आजारी होते. वैद्यकीय उपचारांनी ते बरे झाल्याचे सांगितले. त्यातील रंगनाथन अय्यर या बेघराची व्यथा सांगून उपचारानंतर कंपनी मध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. नाशिक शहराचा वेग वाढतोय. वापरात नसलेल्या इमारतींचा निवारा केंद्र म्हणून उपयोग व्हावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसे नियोजन व्हावे अशी विनंती स्वामींनी केली.

 

बैठकीला मनपा उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. राठोड, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना कुटे, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, राज्य अभियान व्यवस्थापक रवींद्र जाधव, प्रसाद राजे भोसले, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे संदीप कुयटे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, डे-ऐनयुएलएम विभागाचे रंजना शिंदे, पल्लवी वक्ते, मनोज धामणे, संतोष निकम, संदीप भोसले आदि उपस्थित होते.

 

 

 

 

 

बेघर निवारा योजनेत नाशिक अव्वल ठरावे- उके

 

 

समिती अध्यक्ष उज्ज्वल उके यांनी नाशिकमधील बेघर शोध मोहिमेचे कौतुक करून मनपाच्या आयुक्तासह सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांचा बेघर निवारा योजनेतील उत्साहपूर्ण सहभाग देखील कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच राज्यात बेघर शोध मोहिमेची कार्यपद्धती निश्चित करणार असल्याचे सांगितले. मजुर, कामगार यांच्या कामाच्या ठिकाणी निवारे हवेत, तात्पुरते निवारा शेड उभारावेत अशी सूचना केली. आपुलकी महत्वाची असून माणुसकी सर्वात मोठं चलन असल्याचे सांगितले. पीएम स्वनिधी योजनेप्रमाणे बेघर निवारा यामध्येही नाशिक मनपा अव्वल कामगिरी करेल, असा विश्वास  उके यांनी यावेळी व्यक्त केला. नगरपरिषद प्रशासन संचालनालय उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी बेघरांचे बचत गट तयार करण्याची सूचना केली. ब्रिजेश आर्य यांनी बेघरांचे पुन्हा सर्वेक्षण करणे आणि 2 रिकव्हरी सेंटर उभारण्याची सूचना केली.राज्य निवारा समिती सदस्य डॉ. प्रमिला जरग यांनीही मनपाच्या सादरीकरणावर समाधान व्यक्त केले. बैठकीला ब्रिजेश आर्य आणि प्रमिला जरग हे सदस्य ऑनलाइन उपस्थित होते. दरम्यान समितीने शुक्रवारी रात्री नाशिक शहरातील बेघर केंद्रांची आणि तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली. बेघरांशी संवाद साधला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *