भुताटकीच्या संशयातून आठ कुटुंबाचे स्थलांतर

 

इगतपुरी तालुक्यात अंधश्रद्धेने पुन्हा काढले डोके वर

 

 

इगतपुरी : प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तालुक्यातील धारगाव येथील भोरवाडी या आदिवासी पाड्यामध्ये राहणार्‍या आठ आदिवासींनी भुताटकीच्या संशयातून घरे मोडून इतरत्र स्थलांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भोरवाडी या आदिवासी पाड्यात मागील महिन्यात आजारी असलेल्या एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बालकाला भुताटकीची बाधा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा  आरोप करून संबंधित कुटुंबाने 8 कुटुंबांची झोप उडवून टाकली. यामुळे या कुटुंबात दररोजच भांडणे होऊन वाद वाढायला सुरुवात झाली होती. घोटी पोलिसांपर्यंत ही तक्रार गेल्यानंतर सर्व संबंधित व्यक्तींमधील समज गैरसमज दूर करण्यात आले होते. मात्र त्या 8 आदिवासी कुटुंबांचा ससेमिरा काही थांबलाच नाही. यामुळे रोजचीच भांडणे, वाद आणि शिवीगाळ या प्रकाराला सर्वजण कंटाळून गेले होते. अखेर हे सगळे 8 कुटुंबे घरांची मोडतोड करीत सर्व साहित्यासह स्थलांतर करीत आहेत.

भोरवाडी या आदिवासी पाड्यातील लक्ष्मण धापटे, सोमा शिद, भाऊ पादिर, सनू पादिर, गंगुबाई खडके, शांताराम खडके आणि अन्य 2 अशा 8 कुटुंबाने गाव सोडून स्थलांतर सुरु केले आहे. ग्रामीण आदिवासी भागातील अंधश्रद्धा आदिवासी कुटुंबांच्या मानगुटीवर बसली असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *