नाशिकरोड : प्रतिनिधी
मागील चार महिन्यांपासून पाऊस चालू असून, आजपर्यंत पाऊस उघडण्याचे नाव घेईना. शेतकर्यांनी कशीबशी शेतीची मशागत करून पेरणी केली. उगवणक्षमता चांगली झाली. पाऊस चालू असल्यामुळे सोयाबीन पिकामधील नत्रचे प्रमाण वाढल्याने सोयाबीन पिकाची वाढ होऊन सोयाबीन पिकाला फुले कमी प्रमाणात लागली. त्यात सारखा पाऊस चालल्यामुळे फुलांची कुज झाली. शेंगा लागण्याचे प्रमाण खूप कमी झाले. एका सोयाबीन झाडावर सहा ते आठ शेंगा दिसत आहेत. त्यामुळे सोयाबीन पिकाचे उत्पादन अतिशय कमी होईल, असे जाणकार शेतकर्यांनी सांगितले.
शेतकर्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. त्या शेतकर्यांची समस्या महसूल व कृषी विभागामार्फत विमा कंपन्यांना कळवावी, असे नाशिक खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शरद गायखे यांनी केली. त्यांनी महसूल व कृषी विभाग यांना कळविले त्यावेळी सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली.
यावेळी नाशिक तालुका संघाचे चेअरमन शरद गायखे, सोसायटी माजी चेअरमन व संजय गायधनी, सोसायटी संचालक खंडेराव गायधनी, ज्ञानेश्वर गायधनी, पंढरीनाथ गायधनी, दत्तू गायधनी, दत्तू एखंडे, लक्ष्मण गवळी, सुरेश चौधरी, नाना गायधनी, कुमार गायधनी आदी उपस्थित होते.
शेतकर्यांना भरपाई द्यावी
पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे झाडांमध्ये गर्दी झाली. परिणामी फुलाची कुज झाली. त्यामुळे शेंगांचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचे उत्पादन घटण्याची चिन्हे शेतकर्यांना दिसत आहे. तरी सोयाबीन पिकासाठी शासनाने शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
– शरद गायखे, चेअरमन, शेतकी संघ, नाशिक