तणावावर ट्रम्प-मोदींची खलबते!

शांततेसाठी अमेरिकेची भारताला साद; फोनवरून चर्चा

नवी दिल्ली : वॉशिंग्टन 
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इस्रायल-लेबनॉन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोन्ही जागतिक नेत्यांमधील ही चर्चा अत्यंत कळीच्या वेळी झाली आहे. यामुळे जागतिक शांततेच्या प्रयत्नांना नवी गती मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील हा संवाद केवळ औपचारिक नसून तो जागतिक राजकारणातील नव्या समीकरणांचे संकेत देणारा आहे. पश्चिम आशियातील वणवा शांत करण्यासाठी जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांचे एकत्र येणे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
पश्चिम आशियातील शांतता मुद्द्यांवर चर्चेत भर देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी प्रामुख्याने इस्रायल, लेबनॉन आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षावर चर्चा केली. या भागात शांतता प्रस्थापित करणे जागतिक सुरक्षिततेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी किती आवश्यक आहे, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. सध्या वॉशिंग्टनमध्ये इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात सुरू असलेल्या संभाव्य ’युद्धविराम’ (सीझफायर) चर्चेच्या पार्श्वभूमीवर, हा फोन कॉल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

भारतावर परिणाम नाही
’हॉर्मुझ सामुद्रधुनी’ सागरी मार्गावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, भारत सरकारने देशातील जनतेला मोठा दिलासा देत, गॅसपुरवठा खंडित होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेचा फटका भारतीय ग्राहकांना बसू नये, यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. इंधनपुरवठा सुरळीत राहणार असल्याने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने जनतेला अखंडित पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भौगोलिक आणि राजकीय तणाव असतानाही, केंद्र सरकारने देशात एलपीजी, पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली आहेत.

जागतिक शांततेसाठी कटिबद्धता

दोन्ही नेत्यांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून वाद सोडवण्याच्या गरजेवर भर दिला. हिंसाचार थांबवून सामान्य नागरिकांचे प्राण वाचवणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भारताच्या भूमिकेचे कौतुक

या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी जागतिक शांतता राखण्यासाठी भारताच्या वाढत्या प्रभावाचे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी भारत महत्त्वाची मध्यस्थी किंवा भूमिका बजावू शकतो, असे संकेत या संवादातून मिळाले आहेत.

द्विपक्षीय आणि धोरणात्मक भागीदारी

केवळ पश्चिम आशियाच नव्हे, तर भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला. संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत एकत्र काम करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *