खिशात नाही आणा…

खिशात नसताना
पैशांचा गजर कशाला,
दिखाव्याच्या दुनियेत
खोटा हा साज कशाला
आई-वडिलांच्या कष्टांवर
उभारलेला हा थाट,
स्वतःची ओळख नाही
तर ‘बादशाही’चा राज कशाला?
आजच्या तरुण पिढीसमोर एक गंभीर सामाजिक प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे दिखावा, शान-शौकत आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नादात उधळपट्टी. मी खूप मोठा आहे हे दाखवण्याच्या चक्रात अनेक तरुण स्वतःलाच नव्हे तर आपल्या कुटुंबालाही आर्थिक संकटाच्या खाईत ढकलत आहेत. आजकाल महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे, चार चाकी वाहने, हॉटेलिंग, पार्टी यात पैसे खर्च करणे म्हणजेच प्रतिष्ठा समजले जात आहे. अनेक वेळा प्रत्यक्ष उत्पन्न नसताना किंवा कमाई अत्यल्प असताना केवळ दिखाव्यासाठी महागडे मोबाईल किंवा गरज नसतानाही वाहन घेण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते, जी भविष्यात मोठ्या आर्थिक अडचणींना आमंत्रण देते. परंतु या दिखाव्याच्या मागे एक कटू सत्य दडलेले असते ती म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. घरात आई-वडील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले पण मुलगा मात्र बाहेर बादशाही थाट मिरवत असतो. ही परिस्थिती केवळ हास्यास्पद नाही तर अत्यंत चिंताजनक आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे काही तरुण स्वतः काहीच कमावत नाहीत, पण पूर्णपणे आई-वडिलांच्या जीवावर जगत असतात. रुपया कमावण्याची ताकद नसताना मोठेपणा मिरवणे ही केवळ चुकीची मानसिकता नाही तर ती कुटुंबावर अन्याय करणारी गोष्ट आहे. अशा परिस्थितीत काही पालक सामाजिक दबावामुळे किंवा परंपरेपोटी अशा मुलांचे लग्न लावून देतात. परिणामी, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या घरावर आणखी एक जबाबदारी येते आणि संकट अधिकच वाढते. हे म्हणजे अडचणींना स्वतःहून निमंत्रण देण्यासारखे आहे.
वास्तविक पाहता, कमाई नसताना खर्च करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे होय. मेहनतीने कमावलेला पैसा आणि विनाकारण उधळलेला पैसा यात खूप फरक आहे. आज अनेक तरुण इम्प्रेशन पाडण्यासाठी कर्ज घेतात, क्रेडिट कार्ड वापरतात आणि पुढे जाऊन आर्थिक अडचणीत अडकतात. ही सवय भविष्यासाठी घातक ठरते.
समाजाने आणि विशेषतः तरुणांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की खरी श्रीमंती ही दिखाव्यात नसून विचारांमध्ये, संस्कारांमध्ये आणि कष्टात असते. साधेपणा, बचत आणि नियोजन हीच खरी प्रगतीची चिन्हे आहेत. जेवढे उत्पन्न, तेवढाच खर्च हा जीवनाचा सुवर्णनियम आहे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून, आपल्या जबाबदार्‍या ओळखून आणि योग्य मार्गाने प्रगती करण्याचा प्रयत्न केला तरच खरे यश मिळू शकते. बाहेरचा दिखावा काही क्षणांचा असतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.
आई-वडिलांच्या कष्टाचा सन्मान करून, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्धार केला, तरच खर्‍या अर्थाने बादशाही मिळते ती पैशांची नाही, तर स्वाभिमानाची असते

Don’t carry it in your pocket…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *