हितगुज

काही काही मंडळींना आपले प्रॉब्लेम्स सांगायची सवय असते. प्रॉब्लेम जरूर सांगावेत. कारण त्याशिवाय मन मोकळं होत नाही. पुष्कळ वेळेस प्रॉब्लम सांगता सांगतानाच त्यावर सोलुशन ही सापडते. आणि आता तर डिप्रेशन मध्ये जाण्याचे असे काही मुद्दे समोर येत आहेत काही नवाजलेल्या व्यक्तींच्या आत्महत्ये प्रकरणी… की आपल्या मनातला सल, खंत, बोलून दाखवायलाच पाहिजे. खंत बोलून दाखवायला हरकत नाही हो… पण ही मंडळी काय करतात…. खंत बोलून दाखवतात… प्रॉब्लेम्स सांगतात…. थोडक्यात मी काही सुखी नाही, समाधानी नाही… वगैरे वगैरे…आणि स्वतः सपशेल विसरून जातात हो… दुःख या गोष्टीचं आहे…
ऐकणारी व्यक्ती जर अत्यंत जवळची असेल, रक्त रेखेतील असेल तर स्वाभाविक तिला कणवं येते, वाईट वाटतं, प्रसंगी डोळ्यातून अश्रूही…. येणारी प्रतिक्रिया ही ऐकणारी किती जवळची आहे त्यावर अवलंबून…! मग ऐकणार्‍या व्यक्तीला… आता तो प्रॉब्लेम स्वतःचाच वाटू लागतो…. स्वतःच त्यामध्ये गळ्यापर्यंत फसल्याची भावना येते… आणि साहजिकच सोल्यूशन काढण्याकडे विचार धावतात… मग त्या प्रॉब्लेम्सचे सगळे पदर, खोली, लांबी, घनता, क्षेत्रफळ, किती दिवसांचा पाहुणा आहे… हा प्रॉब्लेम कती दिवसांपासून आहे…. सगळ्या सगळ्यांचा शोध… सगळ्या पातळ्यांवर… ती सो कॉल्ड जवळची व्यक्ती स्वतःच्या कुवतीनुसार, अनुभवानुसार, क्षमतेनुसार जीव तोडून उत्तर शोधते, प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि त्या व्यक्तीचा चेहरा अगदी आनंदाने उजळून निघतो. चला.. मी माझ्या अक्काला, दादाला, ताईला ज्या त्या नात्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात मदत केली. तिच्या/त्याच्या कामी आले. आता थोडे दिवस तरी तो अमुक तमुक त्रास तिला /त्याला होणार नाही आणि हे आपण दोन दिवस डोकं लावून सॉल्व्ह केलेला आक्काचा प्रॉब्लेम… आणि त्यावरचं सोल्यूशन… आक्काला ऐकवणार. एवढ्यात आक्का हसतमुखाने दुसराच विषय काढते… आधीच्या त्रासाबद्दल… चकार शब्द नाही… ही मात्र आपलं सोल्यूशन खिशातच राहू देते.
अग अक्का… तू म्हणत होतीस… कालपरवा… ते… अमक्या अमक्याचं काय झालं गं? आक्का मस्त वरणभाताचा कुकर लावता लावता. अं तो काय…. तो चुटकीसरशी सोडवला अगं मी… आणि मी तो कसा सॉल्व्ह केला… हे अगदी उत्साहाने…. भाजी चिरता चिरता… सांगायला लागते.
आता आपल्याला हसावं की रडावं असं होतं. माझे बाई…. जर तू हा प्रॉब्लेम चुटकीसरशी आहे काय आणि नाही काय अशा स्टाइलने सोडवणार होतीस… मग माझे दोन दिवस… दोन रात्री… कां बरं वाया घालवाल्यास… अर्थात, हे स्वगत असतं… उघड उघड बोलू शकत नाही. तिने दिलेला चहा पिऊन आपण घरी येतो… तोंडात मारल्यासारखं…
दोष तिचा नाही…. आपला आहे… आपण किती इन्व्हॉव झालो… आणि मुख्य म्हणजे… विनाकारण… तर बेसिकली… हे लोकं स्मार्ट इनफ असतात… स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला… पण इतरांना ते सांगण्यात…. त्यांना मी असा असा अडचणीत आहे… बरं कां….. असेच काहीसे सांगायच असतं… बरं ह्या सांगण्यालाही न शेंडा न बुडूख… पण तिच्या जवळची सो कॉल्ड… मैत्रीण, बहीण,…. कोणीही.. त्या प्रॉब्लेमचे ओझे स्वतःवर घेणार… आपले दोन चार दिवस… फार मोठा प्रॉब्लेम वाटला.. तर रात्रीही… खराब करणार आणि ती व्यक्ती मात्र खुश… मी कसं चुटकीसरशी… वगैरे वगैरे. अरे, पण तुम्ही काही प्रॉब्लेम सांगितला नाही… सगळं चांगलं चाललंय असं सांगितलं तर काय आम्ही तुमच्या खनपटी ला विक्रम वेताळ सारखं बसून तुम्हाला विचारणार आहोत कां? तुम्ही आनंदात असाल तर आम्हाला काय दुःख होणारे… पण अगर उन्होने इतना सोचना था. तो हम किस कामके…हे म्हणजे मला वाटते.. स्वतःचे ओझे सोबत्याच्या गाठोड्यामध्ये देणार्‍या आणि
स्वतः छान प्रवास करणार्‍या आज्जीबाईच्या गोष्टीसारखे झाले…
मला आठवते, कॉलेजमध्ये आमचा पाच जणींचा ग्रुप होता. त्यातली श्यामा नेहमी प्रॉब्लेममध्ये असायची. असायची की आम्हाला सांगण्यापुरते हे कळण्याचं ते वयही नव्हतं. उलट मैत्रीण म्हणजे सब कुछ.. असे वय ते… दिवसभर आणि संध्याकाळी क्लासला भेटल्यावरही तिच्या.. सावत्र आईचे, मोठ्या भावाचे सर्व दुखडे आम्हाला सांगायची. आम्ही तिच्या आईचा आणि भावाचा स्वभाव आठवून आठवून तिला दुसरे दिवशी सोल्यूशन देणार…. तर बाईसाहेबाना गंधवार्ता नसायची… ती अगदी टामटूम असायची…
तिला माहीतही नसायचे की तिच्या अप्रोक्ष आम्ही चौघी तिच्याच प्रॉब्लेमची चर्चा करायचो. त्यामध्ये आमचे ऐन तारुण्याचे, कॉलेजचे, महत्त्वााचे…. काही वर्षे…तर नाही… महिने. दिवस ही नाही.. पण काही अमूल्य तास मात्र आम्ही नक्कीच खर्ची घातले. आमची ती मैत्रीण म्हणजे त्या गोष्टीतल्या हुश्शार आज्जीची नात असावी… असं मला आता या स्टेजला तरी नक्कीच वाटतं आहे. हो नं…!

beneficial

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *