कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दहा दिवसांत मोठा दिलासा

कांदा निर्यातबंदी उठवणार : अमित शहा

नवी दिल्ली : प्रतिनिधी
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांविषयी अत्यंत महत्त्वाची आणि उच्चस्तरीय बैठक काल (बुधवारी) दिल्लीत पार पडली.
या बैठकीला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या बैठकीत भाग घेतला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, शिवसेना नेते दादा भुसे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आदी नेत्यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील कांदा उत्पादकांच्या तीव्र नाराजीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या बैठकीत महाराष्ट्रातील कांद्याचा प्रश्न अतिशय सविस्तरपणे केंद्रीय नेतृत्वाकडे मांडण्यात आला. कांद्यावरील निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य (एमईपी) आणि नाफेड व एनसीसीएफकडून केली जाणारी कांदा खरेदी या मुद्द्यांवर बैठकीत प्रामुख्याने ऊहापोह झाला. कांदा दरात सातत्याने होणार्‍या चढ-उतारामुळे राज्यातील शेतकर्‍यांमध्ये असलेली अस्वस्थता केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना पुढील दहा दिवसांत केंद्र सरकारकडून खूप मोठी आणि आनंदाची बातमी मिळेल, अशी ग्वाही या नेत्यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा आणि कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व मागण्या अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतल्या. त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीमुळे कांद्याची कोंडी फुटण्याची मजबूत शक्यता निर्माण झाली आहे. नाफेडमार्फत दिल्या जाणार्‍या दरांमध्ये सुधारणा करणे आणि शेतकर्‍यांना थेट आर्थिक तोटा होणार नाही, अशा पद्धतीने व्यापार्‍यांऐवजी थेट शेतकरी खरेदी करण्यासाठी धोरणात बदल करण्याबाबत केंद्राने अनुकूलता दर्शवली आहे. केंद्र सरकारकडून पुढील काही दिवसांत या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. यामुळे नाशिक, नगर, पुणे आणि सोलापूर यांसारख्या प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळण्याची
अपेक्षा आहे.

अधिक कांदा खरेदी केंद्रे सुरू करणार

दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले की, कांद्याच्या निर्यातीवरील बंदीमुळे शेतकर्‍यांना चांगला दर मिळत नाही, अशी तक्रार होती. यावर अमित शहांनी सांगितले की, अशी कोणतीही निर्यातबंदी नाही,आणि जरी निर्यातबंदी असली तरी मी उद्या सकाळपर्यंत ती उठवेल. त्यामुळे यापुढे कांदा निर्यातीवर बंदी नसेल. तसेच अधिक कांदा खरेदी केंद्रे सुरू होतील, असे आश्वासन शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे, अशी माहितीही वळसे पाटील यांनी दिली.

Big relief for onion farmers in ten days

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *