अंतरवाली :
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा काल सहावा दिवस आहे. काल राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, उदय सामंत या सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मराठा समाजाला आजपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. तर विखे पाटलांनी अर्ज करण्यास अडचण येत असेल तर अधिकार्यांना भेटा, असे आवाहन मराठा समाजाला केले आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, हैदराबाद गॅझेटनुसार जी संख्या आहे, त्याप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात यावीत. तुम्ही प्रमाणपत्र द्याल, पण व्हॅलिडिटी कशी देणार, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. कारण वंशावळ मागते आणि ती वंशावळ मान्य केली जात नाही. नाते, रक्ताचे नाते आणि कुळ याप्रमाणे प्रमाणपत्र देण्यास शिष्टमंडळाने मान्यता दिली आहे.
उद्यापासून अर्ज करा
जरांगे पाटलांनी म्हटले की, उद्यापासून मराठवाड्यातील मुलांनी अर्ज करावेत. रक्तातले नाते, सेम आडनाव असेल तर अर्ज करा. नसेल तर तुमचे कुळ एक आहे का ते पाहा. कुळानुसार अर्ज करा. तुम्ही नाते संबंधातील आहेत का, पाहा आणि उद्यापासून अर्ज करा. त्यानंतर आपण सरकारला व्हॅलिडीटी आणि प्रमाणपत्र मागू. दोन दिवसात काय परिस्थिती आहे ती समोर येईल.
अर्ज स्वीकारले नाही तर इथे या
जरांगे पाटलांनी पुढे बोलताना म्हटले की, तुमचे अर्ज स्वीकारले नाही तर तुम्ही पुन्हा इथे या. मी यांना फोन करून सांगतो की अर्ज नाही घेतले. यावर बोलताना विखे पाटलांनी म्हटले की, गॅझेटनुसार तुम्ही अर्ज केले आणि अर्ज नाही घेतले तर जिल्हाधिकार्यांकडे अर्ज करा. यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यानंतर कलेक्टर संबंधित अधिकार्यांना सांगून कार्यवाही करतील. यामुळे तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाही.
Hunger strike to continue until demands are met: Jarange