खा. राऊतांच्या शिंदेसेनेवरील विधानाने चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. दरम्यान, यावर बोलताना खा. संजय राऊत यांनी तुम्हाला आता पश्चाताप होत असेल तर ’मातोश्री’वर येऊन तो व्यक्त करा. तेथे आल्यावर विचार करू, असे विधान त्यांनी नाशिकमध्ये केले. त्यांच्या विधानाने मात्र अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
दरम्यान, आताची शिंदेंची सेना ही अमित शहांची सेना असल्याची टीकाही खा. राऊत यांनी केली.
खा. राऊत बुधवारी (दि.3) नाशिक दौर्यावर आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, की विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सध्या घोडेबाजार सुरू झाला आहे. या घोडेबाजारात शिवसेने(उबाठा)ने सहभागी होऊ नये, असे रवींद्र मिर्लेकर यांचे म्हणणे होते. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नाशिकमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला. मतांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे कोणी इच्छुक पुढे आले नाहीत. मिर्लेकर यांची चूक नसल्याचे खा. राऊत यांनी म्हटले. शिवसेना हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्याच नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ज्यांना भाजपच्या खर्या स्वरूपाची जाणीव झाली असेल त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी. असेही त्यांनी म्हटले. मोदी-फडणवीस यांच्या घोषणा केवळ फसवणूक असतात. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे. प्रत्येक योजनेत सरकार लोकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी भाजपला मतदान करू नये. शेतकर्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मोदींच्या सभांना जाणे बंद केले तर त्यांचे अनेक प्रश्न आपोआप सुटतील, असे त्यांनी सांगितले.
गट-तट नाहीत
पक्षात एकच गट आहे आणि तो म्हणजे, बाळासाहेब ठाकरे यांचा, असे सांगत खा. राऊत यांनी पक्षात कुठलेही गट-तट नसल्याचे स्पष्ट केले. नाशिकमधील नाराजीच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मी या पक्षाचा नेता आहे. माझ्या सहीशिवाय एकही नियुक्ती होणार नसल्याचे म्हटले.
शिंदेसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू
आमच्याकडील मते कुणाला द्यायची, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. तुम्हाला निकालाच्या वेळी कळेलच की, आम्ही कुणाला मतदान केले. पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू शिंदे गटच आहे. नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरला हे चांगलेच झाल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे नगरसेवकांना आर्थिक बळ मिळेल, अशी उपरोधिक टीकाही खासदार राऊत यांनी केली.
If you want to repent, come to ‘Matoshree’.