पेरणीसाठी मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
निफाड : तालुका प्रतिनिधी
आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही काळ सुटका झाली असली, तरी अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
यंदा हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकर्यांची चिंता वाढली होती. त्यातच मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे खरीप पेरण्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, सोमवारी आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभालाच सकाळपासून आकाश ढगाळले होते आणि दुपारनंतर अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. वादळाशिवाय झालेल्या या पहिल्या पावसाने निफाडच्या पूर्व भागासह संपूर्ण तालुक्याला कवेत घेतले.
विविध भागात हजेरी सुरुवातीला वाकद, शिरवाडे, देवगाव, कोळगाव, कानळद, रुई, धानोरे, विंचूर, डोंगरगाव, नांदगाव, धारणगाव, खेडले झुंगे, सारोळेथडी, नांदूरमध्यमेश्वर, दिंडोरी तास, तारुखेडले, तामसवाडी, करंजी खुर्द, ब्राह्मणवाडे, खानगाव थडी आणि म्हाळसाकोरे या परिसरात पावसाने सुरुवात केली.
त्यानंतर सायंकाळच्या सुमारास खडकमाळेगाव, सारोळेखुर्द, पिंपळगाव, रानवड, पालखेड, नांदुर्डी, उगाव, शिरवाडे वणी, सावरगाव, सायखेडा, चांदोरी, निफाड, कोठुरे आणि करंजगाव भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. रानवड, सारोळे खुर्द आणि लासलगाव परिसरात उभ्या पिकांना जीवदान मिळेल एवढा पाऊस झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
वरुणाचे स्वागत केले, पण उघड्यावरील कांदा ओला झाला. पहिल्याच पावसात बालगोपाळांनी ओलेचिंब होऊन नाचण्याचा आनंद लुटला. दुसरीकडे, अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक शेतकर्यांचा उघड्यावर असलेला कांदा ओला झाला, तर शेतमाल विक्रेते व व्यावसायिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरू झाल्याने नागरिकांनी आपली घरे, छपरे आणि कांदा चाळींच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. दरम्यान, सोमवारी मोठी लग्नतिथी असल्याने विवाह सोहळ्यांमध्ये वर्हाडी मंडळींची मोठी धांदल उडाली.
पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. बळीराजाच्या चेहर्यावर समाधान आहे. मात्र, पेरणीपूर्व मशागती पूर्ण करण्यासाठी शेतकरी आता जोरदार पावसाची वाट पाहत आहेत.
Niphad receives the first rain of the Ardra Nakshatra.