राज्यभरात पावसाने हाहाकार!

मुंबई-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद, लोकल ट्रेन सेवा विस्कळीत

पुणे-नाशिक महामार्गासह राज्यभरातील अनेक महत्त्वाचे मार्ग         पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई । प्रतिनिधी
सततच्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीच्या इशार्‍यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे वाहतूक, रेल्वे आणि शैक्षणिक संस्थांसारख्या सर्व सेवांवर गंभीर परिणाम होत आहे. मुंबई-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद झाल्याने तसेच रेल्वे सेवाही प्रभावित झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबईत लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमानी हैराण झाले. याशिवाय, पुणे-नाशिक महामार्गासह राज्यभरातील अनेक महत्त्वाचे मार्ग पाण्याखाली गेल्याने जागोजागी वाहतूक ठप्प व विस्कळीत झाली. मुसळधार पावसाने महामुंबई, कोकण-पालघरसह, पुण्यात सोमवारी शाळा-कॉलेजेसना सुटी होती. तर, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
सततच्या पावसामुळे आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्हीवरील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुढील आदेशापर्यंत दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे बंद केली. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी सध्या या रस्त्यांवरून प्रवास करू नये आणि अत्यंत तातडीचे काम असल्यास प्रशासनाकडून अधिकृत सूचना मिळाल्यानंतरच बाहेर पडावे.

रेल्वेमार्ग पाण्याखाली
मुंबईची जीवनरेखा मानल्या जाणार्‍या लोकल ट्रेन सेवा पावसामुळे मंदावल्या होत्या. मात्र, प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्यामुळे सोमवारी मुंबईकरांनी घरीच थांबणे उचित मानले. पश्चिम रेल्वेवरील वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल ट्रेन्सही अर्धा ते पाऊण तास उशिरा धावल्या. कल्याण स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्‍या गाड्याही काल दिवसभर उशिरा धावत होत्या.

विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित
मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे, विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन मुंबई विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने सोमवारी, म्हणजेच 6 जुलै रोजी होणार्‍या सर्व परीक्षा स्थगित केल्या. परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने कळवले आहे की, या स्थगित परीक्षांचे नवीन आणि सुधारित वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाईल.

राज्यात आतापर्यंत पावसाने 13 जणांचा मृत्यू

महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली की, मुंबई, पालघर आणि रायगडमध्ये अभूतपूर्व पावसामुळे गेल्या काही दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्यातील हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर, कर्जत-लोणावळा भोर घाट विभागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने, महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा सोमवारी पहाटे स्थगित करण्यात आली.

Rains wreak havoc across the state!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *