भरपावसाळ्यात लासलगाव तहानले; पाणीपुरवठा ठप्प

पाणीयोजनेत वारंवार बिघाड; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

लासलगाव : प्रतिनिधी
भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची नामुष्की लासलगावकरांवर आली आहे. गेल्या 12 ते 15 दिवसांपासून शहराचा नियमित पाणीपुरवठा ठप्प असल्याने हजारो नागरिकांना विहिरी, बोअरवेल आणि खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे नळांना थेंबभरही पाणी नसल्याने लासलगावकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागे 16 गावे पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार फुटणे, नांदूर परिसरातील वीजपुरवठा खंडित होणे, आणि लासलगाव-विंचूर रस्त्याच्या कामादरम्यान मुख्य जलवाहिनीचे झालेले नुकसान ही प्रमुख कारणे ठरत आहेत. तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने जॅकवेलपर्यंत आवश्यक पाणीसाठा पोहोचत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
पाणीटंचाईमुळे घरगुती वापरासह व्यापारी व लघुउद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबांना दररोज 250 ते 300 रुपये खर्च करून खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट सुरू असल्याने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, काही नागरिकांनी नातेवाइकांकडे स्थलांतर केले असून, काहींनी लासलगाव सोडून नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा विचार सुरू केला आहे.

Lasalgaon parched in the peak of the monsoon; water supply halted.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *