खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष

सिन्नर : प्रतिनिधी
फळ्यावर अक्षरे गिरविणारे शिक्षकांचे हात जेव्हा खडक फोडतात, खड्डे खोदतात आणि रोपांना पाणी घालतात, तेव्हा शिक्षणाचा खरा अर्थ कृतीतून दिसतो. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या शहा (ता. सिन्नर) येथील श्री. भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी दोन दशकांत खडकाळ व उंच-सखल असलेला सहा एकर परिसर 850 हून अधिक वृक्षांनी हिरवागार केला आहे.
या हिरवाईमुळे दररोज 85 हजार लिटरपेक्षा अधिक ऑक्सिजन निर्माण होतो. तर सुमारे 20 टन कार्बन शोषला जात असल्याचा अंदाज आहे.
सुमारे 20 वर्षांपूर्वी खडकाळ व उंच-सखल परिसरात पर्यावरण संवर्धन उपक्रमाला सुरुवात झाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत श्रमदानातून टेकड्या सपाट करून खडक फोडत वृक्षांसाठी खड्डे तयार केले. यातून वृक्षलागवडीसाठी जागेसोबतच मैदानही तयार झाले. दोन दशकांत विद्यालय परिसरात तीन हजारांहून अधिक वृक्षांची लागवड झाली. निंब, वड, पिंपळ, चिंच यांसह विविध देशी वृक्षांची लागवड व संगोपन आजही सुरू आहे.
वृक्षलागवडीनंतर त्यांचे संगोपन हे मोठे आव्हान होते. विद्यालयात पाण्याची पुरेशी व्यवस्था नसतानाही शिक्षक व विद्यार्थ्यांनी सुमारे एक किलोमीटरवरून पायी चालत पाणी आणून रोपे जगविली. उन्हाळ्यात तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असतानाही रोपांची नियमित निगा राखली. केवळ वृक्षलागवडीपेक्षा त्यांचे संगोपन करून ते मोठे करण्यावर भर दिला. आज परिसरातील 850 हून अधिक मोठी झाडे या सातत्यपूर्ण परिश्रमांची साक्ष देत आहेत. नव्याने लागवड केल्या जात असलेल्या वृक्षांना संस्थेने पाण्याची व्यवस्था करून
दिली आहे.

शाळेच्या आवारातून गावागावांत पोहोचली हिरवाई

विद्यालयाचा पर्यावरण संवर्धन उपक्रम केवळ आवारापुरता मर्यादित राहिला नाही. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, ज्येष्ठ संचालक विजय गडाख, कार्यकारी संचालक अभिषेक गडाख आदींच्या संकल्पनेतून शहा, कारवाडी, रामपूर, मिरगाव व विघ्नवाडी येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षांत गावांमध्ये, घरांच्या परिसरात व शेताजवळ 10 हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. शिक्षकांनी लागवडीनंतरच्या संगोपनावरही लक्ष दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे यापैकी चार हजारांहून अधिक वृक्ष आज मोठे झाले आहेत.

ज्ञानदानासोबत पर्यावरण संवर्धन करणार्‍या या विद्यालयात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक व क्रीडा सुविधांची गरज आहे. लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देण्याची गरज आहे.
-माधव शिंदे, प्राचार्य

फळ्यावर अक्षरे गिरविणारे हात जेव्हा खडक फोडतात, वृक्षांसाठी खड्डे खोदतात आणि उन्हातान्हात रोपांना पाणी घालतात, तेव्हा शिक्षक केवळ शिकवत नाहीत; ते पुढची पिढी घडवत असतात.
-अण्णासाहेब गडाख, अध्यक्ष, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ

Teachers cultivated greenery in rocky soil.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *