– मनीषा चौधरी
जून महिना म्हणजे शाळा सुरु होण्याचा कालावधी. पावसाच्या आगमनाची आतुरता दाटून येणारा महिना. शाळेत नवीन प्रवेशाची कामे सुरु असतात. कुठले माध्यम, कोणती भाषा, खासगी की सरकारी शाळा असे अनेक संभ्रम आणि गोंधळलेले पालक अशावेळी दिसतात. त्यात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे, आई वडील विभक्त झालेल्या मुलांचा प्रवेश आणि त्यातील गोंधळ. अनेकदा असे पालक हे अगदी कमी वयाच्या स्रिया असतात. ज्या मुलांना घेऊन माहेरी आलेल्या असतात. सोबत 2/3 लेकरं आणी या सगळ्यांची चिंता चेहर्यावर स्पष्ट दिसणारे त्यांचे पालक. वयाच्या तिशीत किंवा तिशी ही न ओलांडणार्या अनेक अशा आया असतात, ज्या नवर्या सोबत भांडण झाल्याने, त्याला कायमचे सोडून किंवा तसा निर्णय घेऊन आलेल्या असतात. मुलांचे आधार कार्ड, किंवा कुठल्याही कागद पत्राची माहिती नसलेल्या किंवा ते सोबत न आणलेल्या या माता, त्यांची ती गोंधळालेली मुले बघून अस्वस्थ वाटते. एकीकडे करिअर साठी लग्नाचे वय ओलांडलेल्या उच्चशिक्षित मुली तर दुसरी कडे अगदीच लवकर लग्न होऊन घटस्फोटच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेल्या या माता. जणू लग्न म्हणजे काही काळाचा खेळ आणि नाही पटले म्हणून मोडला डाव. अर्थात कधी कधी परिस्तिथी भयंकर ही असू शकते. पण अनेकदा तर अगदी शुल्लक कारणाने माहेरी परतलेल्या असतात या मुली. किंवा अनेकांचे नवर्याचे लग्नबाह्य संबध असल्याची तक्रार असते. विशेष म्हणजे शाळेत प्रवेश घेऊन काही दिवस शाळेत येणारी ही मुले आई पुन्हा नांदायला गेल्यावर लवकरच शाळाबाह्य होतात. म्हणजे आई वडिलांच्या या लुटूपुटू भांडणात मुलाच्या शिक्षणाचे मात्र तीन तेरा वाजतात. मुळ पायाच कच्चा राहून जातो. ही गोंधळालेली मुले शाळेत आली तरी रमत नाहीत.
मुलांच्या या अनिश्चित जगण्याचा त्यांच्या मानसिकतेवर खोल परिणाम होतो. आज या शाळेत, उद्या त्या गावी, तर परवा पुन्हा वडिलांच्या घरी, अशा चक्रव्यूहात ही मुले अडकतात. यामुळे त्यांचे केवळ शैक्षणिक नुकसान होत नाही, तर त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वासही ढासळतो. वर्गात इतर मुले जेव्हा आपल्या आई-वडिलांबद्दल बोलतात, तेव्हा ही मुले स्वतःला कोशात ओढून घेतात. पालकांच्या तात्पुरत्या आणि घाईघाईने घेतलेल्या निर्णयामांमुळे मुलांच्या हक्काचे बालपण आणि शिक्षणाचा पाया दोन्ही उद्ध्वस्त होते. पालकांचा दुराभिमानाच्या या खेळात विनाकारण मुलं भरडले जाते.
लग्न ही केवळ दोन व्यक्तींची सोय नसून, ती एका नव्या पिढीच्या निर्मितीची आणि जबाबदारीची पायाभरणी आहे, याचे भान आजच्या तरुण जोडप्यांना असणे गरजेचे आहे.
पती-पत्नीमधील मतभेद कितीही तीव्र असले, तरी त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होऊ न देणे ही पालकांची पहिली जबाबदारी आहे.
महिलांना त्यांच्या आणि मुलांच्या हक्कांबद्दल, कागदपत्रांच्या उपलब्धतेबद्दल कायदेशीर साक्षर करणे काळाची गरज आहे.
जून महिना जसा नव्या आशेचा, पावसाच्या तृप्ततेचा असतो, तसाच तो या मुलांच्या आयुष्यात स्थिरतेचा असायला हवा. नवरा-बायको म्हणून एकत्र राहणे शक्य नसेल, तरी ’आई-वडील’ म्हणून असणारी जबाबदारी संपत नाही. कौटुंबिक न्यायालयातील फेर्या आणि माहेर-सासरच्या भांडणातून मुलांचे शिक्षण सुटू नये, हीच मोठी कसरत आहे. कारण आज जर या मुलांचा शिक्षणाचा पाया कच्चा राहिला, तर उद्याचे त्यांचे भविष्य अंधकारमय असेल. पालकांनी आपल्या लुटूपुटूच्या भांडणात मुलांच्या भविष्याचे ’तीन तेरा’ वाजवणे आतातरी थांबवायला हवे. तरच जूनचा हा पाऊस या मुलांच्या आयुष्यात खर्या अर्थाने समृद्धी घेऊन येईल.
A state of utter disarray or shambles; a chaotic mess.