आठवणीतली माणसं…

माणूस गरीब असला तरी चालेल, पण तो मायाळू असावा. जीव लावणारा असावा. अशा माणसाच्या सहवासात जीवन प्रवास सुखकर होतो. आपण कितीही दूर गेलो तरीही आठवणीच्या कप्प्यात ही माणसे नेहमी साद घालतात.
पतीच्या शिक्षकी पेशाच्या नोकरीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचे कोकण समजल्या जाणार्‍या पेठ तालुक्यातील मुरुमहट्टी या लहानशा आदिवासी पाड्यावर छोट्या बाळाला घेऊन राहण्याचं धारिष्ट्य केलं. खूप धाकधूक होती. ऐकीव गोष्टींवरून अनेक गैरहजर मनात होते. सुरुवातीला ही माणसंही दुरूनच असायची, पण जसे आम्ही त्यांच्यात मिसळायला सुरुवात केली तसे त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन होऊ लागले. येथील माणसं फार मायाळू आहेत. गुरुजींचा परिवार म्हणून काळजी घ्यायचे. आपुलकीने चौकशी करायचे. शेतातल्या, रानातल्या भाज्या मिळायच्या. रानातल्या काही भाज्या कशा करायच्या त्यांच्याकडून शिकले. उडदाचे वरण, नागलीच्या भाकरी, भात बर्‍याचदा त्यांच्याकडून यायचा.
मुलाचा पहिला वाढदिवस आमचे मोजके नातेवाईक व मित्रपरिवार आणि येथील प्रेमळ माणसांच्या सोबतीने पाड्यावर झाला. सगळ्यांना वाढदिवसाची उत्सुकता.. पहिल्यांदाच पाहत असावे. तेथील पद्धतीचे तांबे, डिश, वाट्या भेटवस्तू रूपात दिल्या. आजही त्यातील काही मी जपून ठेवल्या आहे. आठवण म्हणून..
निसर्गाची मुक्तहस्ते उधळण येथे झाली आहे. साग, पळस आणि इतर वृक्षराजीने पावसाळ्यात तर निसर्ग अधिकच बहरतो.रानफुलांनी सजतो. सहज फिरायला म्हणून बाहेर पडावे आणि करवंदाच्या जाळीने लक्ष वेधून घ्यावे. हिरव्याकंच कैर्‍यांनी तोंडाला पाणी सुटावे असा हा रानमेवा..
येथील माणसांनी नातं जपून ठेवलं. त्यांच्या मुलांच्या लग्नाला खासकरून बोलावतात. नुकतेच बर्‍याच वर्षांनी तिकडे जाणं झालं. तीच आपुलकी.. तीच माया. कुसुमवहिनी आणि एकनाथभाऊंना काय करू अन् काय नको असे झाले. आम्ही दोघेही चहा घेत नाही म्हटल्यावर सकाळी सकाळी वाटीत मध दिले. आम्ही आश्चर्यचकीत, कारण इकडे औषध म्हणूनही नैसर्गिक मध मिळत नाही. स्पेशल पाहुण्यांसाठी राखून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. खूप दिवसांनी चुलीवरचे वरण, भाजी, भाकरी, लसूण व कैरीची चटणी साधे पण चविष्ट जेवण… अतिशय आग्रहाने व प्रेमाने..तो आनंद व चव पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही.
घराच्या मागे परसबाग. फळं व फुलांची झाडे. अबोली सर्वांगाने फुललेली. वहिनींनी फुले तोडून सुंदर गजरा माझ्यासाठी गुंफला. सर्वांत सुंदर भेट म्हणजे अबोलीचा भरगच्च मोठाच मोठा गजरा…रस्त्यावर असलेल्या पाटीलबाबांच्या मळ्याकडे गाडी वळवली. शिकून नोकरीसाठी बाहेर गेलेली त्यांची मुलं सुटीत घरी आली होती. आम्हाला भेटल्यावर अजूनही गुरुजी आपल्याला विसरलेले नाही याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता… वानोळा म्हणून तांदूळ, उडदाची डाळ, आंबे आणि सोबतीला पुन्हा येण्याचा खूप आग्रह…
आपल्या पद, प्रतिष्ठेचा बाऊ केला नाही तर दिखाऊ, मतलबी वाटणार्‍या या जगातही माणुसकी झरा वाहताना दिसतोय आणि तोच आनंद मनाला सुखावतोय.
-सविता दिवटे-चव्हाण

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

3 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

3 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

3 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

3 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

3 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

3 hours ago