एसआयटीच्या चौकशीकडे लक्ष; पकडला तो चोर अन् बाकीचे साव
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिरात पैसे घेऊन रांगेतील भाविकाला डावलून थेट दर्शनासाठी सोडणारी साखळी पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनने उघड केली आणि विश्वस्त व त्याचे पुतणे यांना अटक केली. या प्रकरणाने त्र्यंबकराजाच्या भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे.
या दर्शनाच्या रॅकेटची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन झाली आहे. संशयितांची सखोल चौकशी होत आहे. त्यात आर्थिक व्यवहार तपासण्यात येत आहेत. मंदिराचे सीसीटीव्ही आणि नोंद व त्यांच्या तपासणीमधून आणखी काहींना पोलीस ताब्यात घेणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यात अफवांचे पेव फुटल्याने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. विश्वस्त मंडळ बरखास्त होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील अर्थकारण भाविक पर्यटनावर आधारित आहे. गेल्या 25 ते 30 वषार्ंंत भाविक पर्यटनात वाढ झाली आणि येथील अर्थचक्र गतिमान झाले. देवदर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढीस लागला तसा तो त्र्यंबकेश्वरलादेखील वाढत आहे. नेमक्या त्याच कालावधीत नारायण नागबली, त्रिपिंडी, श्राद्धविधी व कालसर्प शांती यासाठी गर्दी वाढली. भाविकांना सेवासुविधा पुरवठा करणार्या व्यवसायांना बरकत आली. त्यामधून स्पर्धा आणि हेवेदावेदेखील निर्माण झाले.
प्रामाणिक व्यवसायासोबत शॉर्टकट मार्गाने पैसे कमावण्याचे उद्योग सुरू झाले. गर्दीचा देखावा करत जास्तीत जास्त कमाईचे मार्ग शोधले गेले. त्यात अलीकडच्या काही वर्षात आलेल्या डिजिटल पेमेंटचा वापर करण्याची हातोटी साधली गेली. 200 रुपये तिकीट बारीचा बरोबर फायदा उचलला गेला. पावती पुस्तक होते तेव्हा बनावट पुस्तके आढळली होती. सिनेमाच्या तिकिटाप्रमाणे काळाबाजार करत एक तिकीट दोन ते पाच हजार रुपयांना विकण्यात आल्याची चर्चा असायची. त्यानंतर ऑनलाइन संगणकीय पास पद्धत आली. त्यातदेखील बनावटगिरी झाल्याचे प्रकार निदर्शनास आले होते. त्यात मारहाणीचा ’प्रसाद’देखील भाविकांनी अनुभवला. मात्र, एकाही प्रकरणाची चौकशी शेवटाला गेली नाही. त्यामुळे दर्शनाच्या साखळीला चाप बसला नाही.
विश्वस्तांच्या सहभागामुळे खळबळ
मागच्या काही वर्षांत दर्शनाच्या माध्यमातून पैसे कमावणार्यांना पायबंद घालण्यासाठी विश्वस्त स्वत: मंदिराच्या बाजूने फेरी मारत असायचे. लक्ष ठेवून काळाबाजार करणार्याला पकडून त्याला समज देऊन हुसकावत असायचे. मात्र, कालपरवाच्या घटनेत प्रत्यक्ष विश्वस्त सहभागी असल्याचे उघड झाल्याने भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. यात त्र्यंबकनगरीची झालेली बदनामी व त्यामुळे झालेली हानी कधीही भरून येणार नाही. पैसे देऊन दर्शन करून निघून गेलेला भाविक आता पुन्हा पैसे मागायला येणार नाही. याचाच फायदा अशा काळाबाजार करणार्यांनी घेतला आहे. ’पकडला तो चोर आणि बाकीचे साव’ अशी सध्या परिस्थिती येथे दिसून येत आहे.
ट्रस्टचा कानाडोळा कोणाच्या हितासाठी?
गर्दी असेल तेव्हा पाहुणेरावळे सोडण्यासाठी उत्तर दरवाजाला जाऊन विश्वस्तांना फोन लावून परवानगी घेणे बरोबर आहे. मात्र, गर्दी नसतानादेखील परवानगीचा देखावा सुरू ठेवला आहे. त्याचा फायदा दर्शनाचा काळाबाजार करणारी साखळी घेत होती. त्यांना प्रवेश मिळतो. मात्र, आमच्या पाहुण्यांना नाही, असा रास्त प्रश्न स्थानिकांचा आहे. विश्वस्तांना फोन कोण लावणार आणि तो उचलला जात नाही, अशी तक्रार होती. याबाबत ट्रस्टने नेहमीच कानाडोळा केला तो कोणाच्या हितासाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
Attention to the SIT investigation; The thief and the rest of the thieves were caught