– अस्मिता पाटील
सगळी कामं आवरून झाली दुपारची वेळ जरा निवांत होती… विचार केला थोडा वेळ आहे तर शिलाईची बरीच कामं कधीपासून तशीच पडली आहेत ती जरा पूर्ण करावी .. म्हणून मी जरा दोर्यांचा डबा काढला.. बघते तर काय सगळे दोरे एकात एक अडकलेले.. पांढरा, हिरवा, लाल, निळा, पिवळा…. अरे देवा!! किती हा गुंता… लाल दोरा काढावा तर हिरवा त्यात अडकलेला.. खूप प्रयत्न करूनही गुंता सुटेना… नाइलाजाने काही ठिकाणी दोरा तोडवा लागत होता…मग लक्षात आले… आपल्याला जो दोरा सलग हवा आहे तर त्यात अडकलेल्या इतर दोर्यांना आपल्याला तोडावं लागतंय.
आपलं मनुष्य जातीचंदेखील असंच आहे नाही का… आयुष्यात नात्यांचं, अपेक्षांचे, कर्तव्याचे, भाव -भावनांचे इतके सारे गुंते असतात की… एक सोडवायला गेले की दुसरं काहीतरी आयुष्यातून सुटतं; मग आपणही गुंता सोडवायला बसलो की आपल्याला सलग हवा असलेल्या दोर्याप्रमाणे.. कोणतं नातं, कोणती भावना, कोणती अपेक्षा आपल्याला जास्त गरजेची आहे तेच बघण्याचा प्रयत्न करतो.. आणि त्याला चिकटलेली इतर नाती, भावना, अपेक्षा नाइलाजाने का असेना तोडतो…
पण काही गोष्टी मनाला घट्ट चिटकून राहतात.. कितीही प्रयत्न केले तरी आपण त्या विसरू शकत नाही… खरं तर आपण खुप प्रयत्न करत असतो की या गोष्टी विस्मरणात जातील तर बरं होईल; पण तसं होत नाही… रंगीत दोर्यांचा गुंता सोडवतांना जसा एका दोर्याचा रंग दुसर्याला लागतो.. भलेही आपण तोडून तो वेगळा करतो पण रंग सुटत नाही ; तशीच काही नाती, भावना, अपेक्षा, इच्छा आपल्या मनात घट्ट चिकटून राहतात…भावनिक गुंता सोडवतांना मनाला खुप त्रास होत असतो. कितीही प्रयत्न केला तरी गुंता तर होणारच.. फक्त वेळेवर गुंता आवरायला आपण शिकले पाहिजे… जे कधी माझे नव्हतेच त्यात मन रमवत बसू नये.. भूतकाळ फक्त शिकवण्यासाठी येतो..भविष्याची स्वप्न बघत वर्तमानात जगायला शिकावं.. कारण की
ये जीवन है, इस जीवन का,
यही है, यही है, यही है रंगरूप.
Complication