विठ्ठल-रखुमाई मंदिरे सजली, पावसाचे सावट कायम
नाशिक : प्रतिनिधी
आषाढी एकादशी आज (दि.25) साजरी होत आहे. आषाढी एकादशीनिमित्त शहरातील मंदिरे सजली आहेत. आषाढीनिमित्ताने शहर आणि उपनगरांतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांत उत्साहाचे वातावरण असून, विविध ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, आषाढीवर पावसाचे सावट कायम आहे.
शहर आणि उपनगरांमधील मंदिरांमध्ये साफसफाई, आकर्षक सजावट करण्यात आली असून, विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.पानाफुलांच्या विविध रंगांच्या रांगोळ्या काढण्यात येणार असून, परिसरात चैतन्याचे वातावरण झाले आहे.
आषाढी एकादशी हा दिवस समस्त वारकरी संप्रदाय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यातील अनेक लोक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. तर काही शहरातील विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन भाविक दर्शन घेतात. आषाढीनिमित्ताने विविध शाळांनी दिंडीचे आयोजन केले असून, विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई तसेच वारकर्यांची वेशभूषा करून दिंडी काढण्यात आली. जुन्या नाशकातील नामदेव विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पहाटे पाच वाजता पंचामृतांनी अभिषेक घातला जाणार आहे. त्यानंतर सकाळी 6 वाजता काकड आरती होणार आहे. यानंतर गीतापाठाला सुरुवात होणार असून, सकाळी यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यानंतर शहरातील विविध भजनी मंडळे सेवा रुजू करणार आहेत. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने मुरलीधर लेनमधील विठ्ठल मंदिरातदेखील कार्यक्रम होणार आहेत. सकाळी सात वाजता श्रींचे महापूजन, अभिषेक व पादुकापूजन केले जाणार आहे. सकळी 8.30 वाजता श्रींच्या महाआरतीनंतर फराळ वाटप
होणार आहे.
आषाढीनिमित्ताने सामाजिक संस्थांकडून देवदर्शनाला आलेल्या भाविकांना फराळ, फळ वाटप करण्यात येणार आहेत.
पौराणिक कथेनुसार, पुंडलिक हा आपल्या आई-वडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होता. त्याच्या मातृ-पितृसेवेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्या वेळी पुंडलिक आई-वडिलांच्या सेवेत व्यस्त असल्यामुळे त्याने भगवानांना थोडा वेळ थांबण्याची विनंती केली आणि त्यांच्यासमोर एक वीट फेकली. भगवान त्या विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहू लागले. याच रूपाला आज विठ्ठल किंवा विठोबा म्हणून ओळखले जाते. पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती आजही विटेवर उभी असल्याचे दर्शन घडते.
आषाढीला लाखो वारकरी महाराष्ट्राच्या विविध भागांतून पायपीट करत पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. वैदिक पंचांगानुसार, आषाढ शुक्ल एकादशीला येणारी आषाढी एकादशी जिला देवशयनी आषाढी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष स्थान आहे. या दिवशी केलेली उपासना, जप, दान आणि नामस्मरण यांचे विशेष पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो.
तेल-तुपाच्या दरातही वाढ
फराळासाठी लागणार्या शेंगदाणा तेलाचे दर 175 ते 190 प्रति लिटर, तर साजूक तूप 550 ते 570 प्रति किलो दराने विकले जात आहे. त्यामुळे घरच्या घरी फराळ तयार करण्याचाही खर्च वाढला आहे.
रताळ्यांसह इतर फराळी पदार्थांना मागणी
उपवासाला सर्वसामान्यांकडून रताळ्यांची मागणी जास्त असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रताळ्यांचे दर मात्र वाढले आहेत. किलोला 50 ते 60 रुपये भाव मिळत आहे. उपवासासाठी फळे, रेडिमेड उपवासाची पिठे, तयार पदार्थ यांना मागणी वाढल्याचे चित्र आहे.
Devotional atmosphere in the city on the occasion of Ashadhi Ekadashi.