संपादकीय

मार्चमध्ये अनुभवा टी-20 विश्वचषकाचा थरार

येत्या मार्च 2026 मध्ये टी-20 विश्वचषकाचा थरार अनुभवायला प्रत्येक जण चातक पक्ष्याप्रमाणे आसुसला आहे. त्याचे अधिकृत यजमानपद भूषवण्याचा मान यंदा आपल्याला मिळाला आहे. त्यानिमित्त खास सन 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या दिमाखदार कामगिरीच्या आठवणींचा हा उजाळा.
या संपूर्ण स्पर्धेत संघाने सरस कामगिरीने विश्वचषक पटकावला.रोहित शर्मा आणि टीमने केलेल्या जिगरबाज खेळीने संपूर्ण क्रिकेट विश्वाची मने जिंकली. प्रत्येक खेळाडूने केलेल्या वैयक्तिक तसेच सांघिक कामगिरीने भारतीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. जवळपास एक तपाएवढ्या दीर्घ कालावधीनंतर भारत पुन्हा एकदा जगज्जेता झाला, हे पाहून 1983 साली आपण जिंकलेला पहिला एकदिवसीय विश्वचषक, त्यानंतर सन 2007 मध्ये जिंकलेला पहिला टी-20 विश्वचषक आणि 2 एप्रिल 2011 या दिवशी झालेली सन 1983 च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती या आठवणी परत एकदा ताज्या झाल्या.
आजपर्यंत आयोजित झालेल्या इतर सर्व टी-20 विश्वचषकांपेक्षा हा विश्वचषक अनेक बाबींनी निराळा होता. अमेरिकेतील खेळपट्ट्या आणि तेथील वातावरण या दोन गोष्टींनी संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाला कलाटणी दिली. जवळपास सर्वच सामन्यांत सरासरीपेक्षा कमी धावसंख्या नोंदवली गेली. त्यामुळे प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक झाला.
बहुतेक सामन्यांमध्ये तर कच्च्या व नवोदित संघांनी काही बलाढ्य संघांना नमवून स्पर्धेत उलटफेर घडवून आणण्याची किमया साधली. या स्पर्धेमध्ये भारताच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे गतकाळातील संघर्ष करीत असलेल्या खेळाडूंचा परत गवसलेला सूर होय. रोहित शर्माने संपूर्ण स्पर्धेत दाखवून दिलेल्या त्याच्या महत्त्वाकांक्षेला तोडच नव्हती. ग्रे टेस्ट ऑफ ऑल टाइम, रनमशिन आणि किंग कोहली ही केवळ बिरुदावली नसून प्रत्यक्षात आपल्यात असलेले अंगभूत गुण आहेत, याची प्रचिती विराट कोहलीने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीतून करून दिली.
जसप्रीत बुमराहचा तिखट मारा आणि हार्दिक पांड्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ सदैव प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील. मुख्य टीम प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करून संघातील सर्वच खेळाडूंनी एकप्रकारे त्यांना निवृत्तीवेळीची गुरुदक्षिणाच अर्पण केली. टी-20 विश्वचषकानिमित्ताने भारतीय संघ विजयी झाल्याने आपला राष्ट्रध्वज तिरंगा संपूर्ण जगाच्या नकाशावर डौलाने आणि अभिमानाने फडकला. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार देशाचा प्रत्येक नागरिक झाला, हे खरोखरच गौरवास्पद आहे.अमेरिकेच्या भूभागावर सातासमुद्रापार भारतीय संघाने टी-20 विश्वचषक उंचावल्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन! आता याच क्षणाची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना करून पुढेही भविष्यात आयोजित होणार्‍या प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ असेच घवघवीत यश संपादन करो, हीच त्यांना शुभेच्छा!

Experience the thrill of the T20 World Cup in March

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago