मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून दहा ठिकाणी उपक्रम
♦ सिमेंटच्या रिकाम्या गोण्या व मातीचा वापर
♦अल्प खर्चात मोठे जलसंधारण
♦ जलस्रोतांना पूरक आधार भूजलस्तर वाढ
♦ रब्बी हंगामातील पाण्याची उपलब्धता सुधारणार
♦ शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीस थेट हातभार
♦ ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांचा उत्कृष्ट समन्वय
येवला : प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकसहभागातून येवला तालुक्यातील दहा ठिकाणी श्रमदानातून वनराई बंधारे साकारले आहेत. अधिकारी, कर्मचार्यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून या बंधार्यांना चालना मिळाली असून, कोट्यवधी लिटर पाणी अडवले आहे. यामुळे पावसाचे पाणी अडून जिरवले जाऊन भूजलपातळीत मोठी वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाणी वाहणार्या साइटवर हे वनराई बंधारे श्रमदानातून करण्याच्या सूचना येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिल्या होत्या. यासाठी नोडल अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकार्यांची नेमणूक केली होती, तर विविध विभागांवर याची जबाबदारी देण्यात आली होती. तालुक्याच्या विविध भागांत जलसंधारणाच्या अनेक साइट उपलब्ध असून, पावसाचे पडणारे पाणी वाहून जाते, वाहून जाणारे पाणी अत्यल्प खर्चात लोकसहभागातून अडवले तर ते जमिनीत जिरून भूजलपातळीत वाढ होण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येवला तालुक्यातील विसापूर, विखरणी, राजापूर, शिरसगाव लौकी, सायगाव, गवंडगाव, पन्हाळसाठे, पिंपळखुटे तिसरे, खरवंडी आदी ठिकाणी वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गोण्या टाकून बांध घालण्यात आले. या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी लाखो लिटर पाणी अडवले गेले आहे. हे पाणी जमिनीत जिरून पाणीपातळीत वाढ होणार असल्याने आजूबाजूला असलेल्या शेतकर्यांना सिंचनासाठी फायदा होणार आहे.
वनराई बंधार्यांच्या कामामुळे गावांना थेट फायदा होणार आहे.लोकसहभागातून हे बंधारे होत असून, ग्रामविकासाचा आदर्श नमुना उभा राहत आहे. अजूनही बंधारे करण्याचे काम सुरू आहे.
– संदीप वायाळ, गटविकास अधिकारी, येवला