हॉटेलचे जेवण महाग; वडापावही परवडेना!

नाश्त्यासाठी खिशाला चटका

नाशिक : प्रतिनिधी
उदर भरण नोहे जाणिले जे यज्ञकर्म असा श्‍लोक असला तरी आता हा यज्ञकर्म महागाईमुळे परवडेनासा झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ केल्याने वडापाव पासून तर जेवणाच्या थाळीपर्यंत सर्वच महाग झाले आहे. त्यामुळे हॉटेलचे जेवण आता परवडेनासे झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खाद्यतेलांसह इतर किराणा मालाचे तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे दर वाढविले आहेत.सुटीच्या दिवशी चेंज म्हणून अथवा कोणी पाहुणे आल्यास त्यांच्या सोबत जेवणाला हॉटेलला जाणे आता खिशाला चटका लावणारे ठरत आहे. किराणा माल, खाद्यतेले, बेसन, शेंगदाणे याशिवाय भाजीपाला आणि गॅस अशा सर्वच वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्यामुळे हॉटेलचालकांनी खाद्यपदार्थांच्या दरांमध्ये वाढ केली आहे. नाश्ता करायचे म्हटले तरी दहा रुपयांचा वडापावसाठी आता 18 रूपये मोजावे लागत आहेत.
भोजनाच्या थाळीनेही 200 रूपयांचा टप्पा पार केला आहे. किराणा मालासह भाजीपाल्याचेही दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे घरचे जेवणही परवडेनासे झाले आहे. घरगुती गॅस एक हजाराच्या पुढे तर व्यावसायिंक गॅस अडीच हजारापर्यंत पोहोचल्याने जेवणाचा खर्चही महागला आहे.सामान्य नागरिक वीकेंड अथवा चेंज म्हणून बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन करत असतात मात्र वाढलेल्या खाद्य पदार्थांच्या किंमतीमुळे हॉटेलिंग परवडेनासे झाले आहे.

पदार्थ               आधीचे दर            वाढलेले दर
मिसळ    –   60-80 रू              80- 110रू
पावभाजी –   40-60 रू             60-120 रू
थाली–         100-150 रू         160-220 रू
वडापाव –     10- 12 रू             15 -18 रू
पाणीपुरी –    15-20रू               25 -30 रू
समोसा –      10 -13 रू            15-18रू
कचोरी–        10-13 रू             15 -18 रू
पाववडा –     10-13 रू             15-18 रू
भजी –         20-25 रू             25 -30 रू
मसाला डोसा – 50-70रू            70-90 र

प्रतिक्रिया
भाजीपाला ,किराणा, खाद्यतेल आणि इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे खाद्यपदार्थांचे दर वाढवणे अपरिहार्य आहे. तरीही ग्राहकांना अधिक भुर्दंड पडू नये म्हणून 20 टक्केच दरवाढ केली आहे. सध्या हॉटेलिंगला गर्दी वाढत जरी असली तरी सातत्याने होणार्‍या इंधनाच्या भरमसाठ दरवाढीमुळे सर्वच साहित्याचे दर वाढत आहे. मात्र ग्राहकांना त्याच किंमतीत पदार्थ द्यावे लागत आहेत कारण आम्ही सतत मेनूकार्डमध्ये बदल करू शकत नाही.
विक्रम उगले (हॉटेल करिलिव्हज)

महागाई खुप वाढली आहे. घरखर्चच परवडत नाही. हॉटेलिग तर महागाईच्या काळात शक्यच नाही. सरकारने महागाई नियंत्रित करायला हवी. गरीबांचा वडापावही आता 18 रूपये झाला आहे.त्यामुळे हॉटेलिंग परवडत नाही.
तुषार सोनवणे (नागरिक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *