देशात सरासरीपेक्षा कमी, 90 टक्के पर्जन्यमानाची शक्यता
जून ते सप्टेंबर 2026 या मुख्य मान्सून हंगामासाठी हा अंदाज लागू असेल. या काळात देशात सरासरीच्या 90 टक्के पाऊस अपेक्षित आहे. हवामानशास्त्राच्या परिभाषेत 90 ते 95 टक्के पाऊस हा ’सामान्यपेक्षा कमी’ या श्रेणीत मोडतो. त्याचा शेती व अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडणार आहे. देशातील बहुतांश शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने, या सुधारित अंदाजामुळे खरीप हंगामातील पेरण्या आणि पीक नियोजनाबाबत प्रशासनासह शेतकर्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
कोकण विभाग : कोकणात दरवर्षी राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडतो. यंदाही येथे पावसाचे प्रमाण अधिक राहील, मात्र ऐतिहासिक सरासरीच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र : या भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव) ते दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकर्यांना पावसाच्या आगमनाची आणि सातत्याची योग्य खात्री करूनच नियोजन करावे
लागेल.
मराठवाडा : मराठवाडा विभाग हा भौगोलिकदृष्ट्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. यंदा येथे पावसाची तूट जाणवू शकते. त्यामुळे प्रशासनाला पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या पाण्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
विदर्भ : विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीच्या जवळपास किंवा त्याहून थोडे कमी राहण्याचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ (भंडारा, गोंदिया, गडचिरोली) आणि पश्चिम विदर्भ (अमरावती, अकोला, बुलढाणा) यांमध्ये पावसाचे वितरण असमान राहू शकते.
महाराष्ट्रावरील संभाव्य परिणाम
राष्ट्रीय पातळीवरील 90 टक्के पावसाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रातही यंदा पावसाची तूट जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याच्या भौगोलिक रचनेनुसार पावसाचे वितरण वेगवेगळे असते. राष्ट्रीय सरासरीच्या घसरणीचा विचार करता, राज्यातील विभागनिहाय पावसाची स्थिती खालीलप्रमाणे राहण्याची शक्यता आहे.
केरळात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा
सध्या संपूर्ण देशाला केरळमधील मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. मात्र, मेच्या अखेरीस महाराष्ट्रात संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ने दिलेल्या नवीन माहितीनुसार, राज्याच्या एका भागात उष्णतेची लाट कायम आहे, तर दुसर्या भागात मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागली आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रांनी आगामी दिवसांसाठी विस्तृत अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, यंदा मान्सूनच्या प्रवासात थोडासा बदल दिसून येत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास काही दिवसांचा विलंब झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनाच्या तारखांमध्येही किंचित बदल अपेक्षित आहे.
IMD also predicts less rain!