गैरसोयीबद्दल ना. महाजनांनी मागितली माफी; रामरक्षावरुन ठाकरेंवर टीका
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी शहरभर सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल जलसंपदा व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिककरांची जाहीर माफी मागितली. सध्या काही प्रमाणात त्रास होत असला तरी ही सर्व कामे नाशिकच्या भविष्यासाठी असून, दर्जा आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रविवारी ’मिशन ग्रीन मान्सून’ उपक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावरुनही टोला
लगावला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि कॅनॉल रोडसह विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत.
या कामांमुळे नागरिकांना तात्पुरता त्रास होत असला तरी भविष्यात त्याचा मोठा लाभ मिळेल. तसेच ’मिशन ग्रीन मान्सून’अंतर्गत नाशिकमध्ये एक लाख रोपांंची लागवड करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी म्यानमारमध्ये अडकलेल्या सुमारे नऊशे भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही दिली.
अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन
अयोध्येतील राम मंदिरातील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या ’रामरक्षा आंदोलनावर’ मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कोणीही थांबायला तयार नसल्याने पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन झाली असून, दोषी आढळणार्यांवर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांनी राज्यभर फिरण्याची गरज व्यक्त केल्याच्या वक्तव्याचे समर्थन करताना महाजन म्हणाले की, पक्ष वाढवायचा असेल तर कार्यकर्त्यांमध्ये मिसळून संघटन मजबूत करावे लागते. तसेच खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यांवरही त्यांनी प्रत्युत्तर देत चुकीचे काम केल्यास कारवाई निश्चित होईल, असा इशाराही दिला.
Inconvenience now due to the Kumbh-related work, but benefits in the future.