नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून उपाययोजनांची गरज
चांदवड : केशव कोतवाल
चांदवड शहरासह तालुका सध्या बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे आणि हल्ल्यामुळे दहशतीखाली आहे. काही महिन्यांत बिबट्यांचा वावर केवळ जंगलापुरते मर्यादित न राहता, आता मानवी वस्त्या, शेती आणि रहदारीच्या रस्त्यांवरही सर्रास दिसून येत आहे. यामुळे चांदवडकर, विशेषतः शेतकरी, ग्रामीण भागातील रहिवासी मोठ्या चिंतेत आहे.शेतीकामांसाठी बाहेर पडणे किंवा रात्री घराबाहेर फिरणेही धोक्याचे वाटू लागले आहे.
चांदवड शहरातील हनुमाननगर, वरचे गाव परिसरात सोमवारी रात्री बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बिबट्या हनुमाननगर परिसरातील वस्तीजवळ फिरताना दिसला. परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, वनविभागाने तातडीने लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
तालुक्यात बिबट्यांचा संचार वाढण्यामागे वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि शेतीविस्तारामुळे बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण होत आहे. जंगले आणि त्यांचे नैसर्गिक भक्ष्य कमी झाल्याने त्यांना अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांकडे यावे लागत आहे. अनेकदा ते पाळीव जनावरांवर हल्ला करतात. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळेही बिबट्या पाण्यासाठी मानवी वस्तीजवळ विहिरी किंवा पाण्याच्या स्त्रोतांकडे येतात. बिबट्यांच्या वाढत्या प्रजननामुळे त्यांची संख्या वाढत असल्याने त्यांना नवीन क्षेत्रांची गरज भासत आहे, ज्यामुळे ते मानवी वस्तीजवळ येत आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांनी चांदवड तालुक्यात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. चांदवड तालुक्यातील भडाणे-रायपूर शिवारात रामदास आहेर (वय 45) या शेतकर्यावर रात्री मजुरी करून घरी परतत असताना बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वन विभागाने तातडीने दोन पिंजरे लावले आहेत. भडाणे येथील दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी चांदवड तालुक्यातील राहुड येथील पाडगण मळा भागात सुशीलाबाई उत्तम कहांडळ (वय 60) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्या घराबाहेर झोपलेल्या असताना बिबट्याने त्यांना ओढत नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांच्या नातवाने आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. महिलेचा जीव थोडक्यात वाचला. त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथे बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, बिबट्या आता पशुधनावरही हल्ले करत असल्याचे स्पष्ट
झाले आहे.
प्रशासनापुढील आव्हान, उपाययोजना
बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पशुधनाचे नुकसान होत आहे आणि शेती करणेही धोकादायक बनले आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी वन विभाग, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास संरक्षित करणे आणि त्यात अन्न व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, जेणेकरून त्यांना मानवी वस्तीकडे येण्याची गरज भासणार नाही. नागरिकांना बिबट्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, बिबट्या दिसल्यास काय करावे आणि काय करू नये, याबद्दल माहिती देणे. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळणे, घराबाहेर झोपणे टाळणे, शेतात जाताना किंवा परतताना गट करून जाणे यांसारख्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आवश्यकतेनुसार पिंजरे लावून त्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे. बिबट्यांच्या नैसर्गिक भक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करणे, जेणेकरून ते पाळीव प्राण्यांवर अवलंबून राहणार नाहीत.
गंगापूर धरणात दीड टक्क्याने पाणीसाठ्यात वाढ नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात मे महिन्यात व जूनच्या पहिल्या…
‘सलीम कुत्ता’वरून आकांडतांडव ते प्रवेशासाठी पायघड्या नाशिक : गोरख काळे मागील काही दिवसांपासून सुधाकर बडगुजर…
पावसाळ्यात कपड्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण दमट हवामानामुळे कपड्यांना वास येणे, बुरशी येणे…
काळ बदलला, नजर का नाही? एक स्त्री जेव्हा विधवा होते, तेव्हा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटतं,…
सहा लिंबांचे लोणचे. तीन लिंबांचा रस काढायचा. उरलेली तीन लिंबे चिरून बिया काढून घट्ट झाकण्याच्या…
खा. वाजे यांची महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा नाशिक : प्रतिनिधी नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपुलाचे रखडलेले…