संपादकीय

‘सीजेपी’चे आंदोलन भरकटते आहे का?

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर चाललेले आंदोलन समस्त प्रसिद्धिमाध्यमांची हेडलाइन बनले आहे. नीट पेपरफुटीनंतर कॉक्रोज जनता पार्टीने देशाच्या विविध भागांत आंदोलने केली. ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पेपरफुटीचे दायित्व घेऊन देशाच्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर 20 दिवस उपोषण केले. ज्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले.
वृत्तपत्रांसह समाजमाध्यमांवरही सरकारविरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या. वांगचुक यांचे समर्थन करण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात पुढे आला, विरोधी पक्षांनीही वांगचुक यांचे समर्थन केले, मात्र त्यानंतर सरकारने त्यात हस्तक्षेप करून वांगचुक यांना जंतर -मंतर येथून उचलून रुग्णालयात हलवले. न्यायालयानेही आता याबाबतीत काही वेगळा निर्णय देण्यास नकार दिला आहे. जंतर -मंतरवर चाललेल्या आंदोलनाला जसा जनतेचा पाठिंबा मिळत होता, तशा तेथील काही वादग्रस्त बाबीही लोकांसमोर येत होत्या. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी सोनम वांगचुक एकीकडे उपोषण करत होते, तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनासाठी आलेले काही तरुण क्रिकेट खेळत होते. मेजवान्या झाडत होते. मंचावर येऊन कुणीही काहीही बरळत होते. स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने ‘हे सरकार सीताच्या पतीचे नाव घेऊन नीताच्या पतीचे काम करत आहे’ असे विधान करून हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांचा अवमान केला. हा अवमान होत असताना कॉक्रोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके फिदीफिदी हसल्याने तो राग मनात ठेवून बरखा त्रेहन यांनी त्यांच्यावर पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोरच शाई फेकली. त्यानंतर बरखा त्रेहन यांना कॉक्रोज जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून त्यांचे केस ओढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच मंचावर आणखी एका महिलेने एक पाकिस्तानी गीत सादर केले. ज्याचे शब्द होते ‘सब बूत उठ्वाए जायेंगे, बस नाम राहेगा अल्लाह का’ ज्याचा अर्थ सर्व मूतीर्र् हटवल्या जातील आणि केवळ अल्लाहचे नाव शिल्लक राहील. हे गाणे फैझ अहमद फैझ या पाकिस्तानी कवीने लिहिले आहे. या गाण्यावरूनसुद्धा आता मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदुस्थानात जसे बहुसंख्येने हिंदू राहत आहेत तसे जैन आणि बौद्धसुद्धा गुण्यागोविंदाने
राहत आहेत.
हिंदूंसह जैन आणि बौद्ध धर्मीय हे मूर्तिपूजक आहेत. या गाण्यातून या तिन्ही समाजाला एकप्रकारे आव्हानच देण्यात आले आहे. येणार्‍या काळात देशातील सर्व मूर्ती हटवल्या जातील आणि केवळ अल्लाहचे नाव या भारतात शिल्लक राहील हे गीत कॉक्रोज जनता पार्टीच्या मंचावर म्हटले गेले. ज्याला पार्टीच्या एकानेही विरोध केला नाही. त्यामुळे हे गीत कॉक्रोज जनता पार्टीचा भविष्यातील अजेंडा आहे की काय, अशी चर्चा आता जनमानसांत सुरू झाली आहे. दिल्ली दंगलीतील आरोपी आणि उमर खालिदचे वडील सय्यद कासीम रसूल इलियास हेदेखील यावेळी मंचावर उपस्थित होते. अभिनेता प्रकाश राज यांनीही याच मंचावरून वादग्रस्त विधान केले, त्यामुळे जंतर-मंतरवर सुरू असलेले कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन नक्की विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी आहे की तरुणांची माथी भडकवण्यासाठी, असा प्रश्न हिंदुत्ववादी आणि देशप्रेमी संघटनांकडून विचारला जात आहे. कुणाल कामरा, प्रकाश राज आणि पाकिस्तानी गीत गाणार्‍या महिलेच्या विरोधात हेट स्पीचचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे. वादग्रस्त लोकांना आपल्या मंचावर स्थान देऊन सामान्य जनतेचा रोष ओढवून घेणार्‍या कॉक्रोज जनता पार्टीचे भविष्य काय असणार आहे हे आता जनतेच्याही हळहळू लक्षात येऊ लागले आहे.

Is the CJP’s agitation losing its way?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago