शाळकरी मुलांचा काठी आणि एकजुटीचा अनोखा उपाय!
लासलगाव : वार्ताहर
निफाड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे देवगाव आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.नुकताच एका बिबट्याला जेरबंद करूनही येथील दहशत कमी झालेली नाही.या बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे विशेषतः शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे जीव टांगणीला लागले आहेत.
चार-पाच दिवसापूर्वी माध्यमिक शाळेजवळ बिबट्या जेरबंद झाल्यानंतर गावकर्यांनी आणि शाळकरी मुलांनी त्याला जागीच ठार मारण्याच्या मागणीसाठी तब्बल 12 तास रास्ता रोको आंदोलन केले होते. वन विभागाने अधिक पिंजरे लावणे, दररोज गस्त ठेवणे आणि थर्मल ड्रोनद्वारे बिबटे शोधण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत बिबट्या वन विभागाकडे सुपूर्द केला होता. मात्र, वन विभागाच्या आश्वासनानंतरही देवगाव परिसरात दररोज कुठेना कुठे बिबट्याचे दर्शन होत असून, हल्ले सुरूच आहेत.
याच बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवात नुकताच एका शिक्षकावर हल्ला झाला, ज्यात ते जखमी झाले असून, त्यांच्या पायाला जखम झाली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेत जाणार्या मुलांत आणि त्यांच्या पालकांमध्ये यामुळे मोठी भीतीचे सावट पसरले आहे. प्रशासनाने तत्काळ अधिक उपाययोजना राबवून या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
बिबट्याच्या दहशतीवर मात करण्यासाठी देवगावमधील शाळकरी मुलांनी एक अनोखी आणि स्तुत्य कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी आता सर्व मुले शाळेत येताना-जाताना हातात काठी घेऊन मिळूनमिसळून एका मोठ्या समूहाने येत असल्याचे चित्र दिसत आहे. एकत्र येऊन चालल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटत आहे. हातात काठी असल्याने बिबट्याने हल्ला केल्यास प्राथमिक प्रतिकार करण्याची त्यांची तयारी आहे. शाळकरी मुलांनी खंत व्यक्त केली की, या भयावह परिस्थितीत आमच्याकडे
दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.
या काठी आणि एकजुटीच्या अनोख्या संकल्पनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे. ही कल्पना मुलांची समयसूचकता आणि एकजूट दाखवते. मात्र, त्याचबरोबर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरही बोट ठेवते. या घटनेमुळे बिबट्या-मानव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ कठोर पावले उचलणे गरजेचे आहे, असे प्राचार्य के. एम. गाजरे, पोलीसपाटील सुनील बोचरे, आमिरशा काद्री, धनंजय जोशी,लहानू मेमाणे, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाणे, सचिन बोचरे, श्रीहरी बोचरे, गोपीनाथ बोचरे, संदीप डुकरे, योगेश बोचरे, ज्ञानेश्वर आरोटे, शालेय समिती, शिक्षक, कर्मचारी यांनी सांगितले.