मरण स्वस्त झालंय का?

कारण छोटं असो वा मोठं पण त्यावेळचा अनावर झालेला राग किंवा अतिनिराशा मनाला आत्महत्येसारखे कृत्य करायला भाग पाडते…अवतीभोवती समाजात सतत ऐकायला येणारी ही गंभीर समस्या होत चाललीय…पण हे कितपत योग्य वाटतं जाणार्‍याला, जगणंच संपवणे हे समस्येचे उत्तर कसे असू शकते? खरंच मरण एवढं स्वस्त झालंय का?
खूप प्रश्‍न पडतात अशा घटनांबद्दल काही पेपरला वाचल्यावर, कुठे ऐकले, कुठे बघितले तर मन सुन्न होतं…घडणार्‍या घटना घडून जातात…पण मागच्या कुटुंबातल्या सदस्यांचं काय होणार, हा प्रश्न पडत नसावा का जाणार्‍या जीवाला? हा विचारच केला जात नाही का? मान्य आहे कधीकधी मानसिक ताणतणाव, पैशाचा अभाव, पती-पत्नीतले वादविवाद, न मिळणारे प्रेम, तरुणाईपुढची नोकरीची समस्या, आजारपण, सुडाची भावना, तर कधी अतिनैराश्य मनाला नकारात्मक विचाराकडे वळवते…पण हे सारं टाळता यायला हवंच..
कुठलीही वेळ थांबत नाही, मग सुख असो वा दुःख, संकट टळेपर्यंत संयम, खंबीरता नावाचं शस्र अंगी बाळगायलाच हवं तरच प्रतिकार करू शकता … मृत्यूवर पाय रोवून पुढे जाता येईन…आणि कष्ट करत पुढे जायलाच हवं तेव्हा सुखाचा मार्ग भेटतोच…ही वेळही निघून जाईन यावर विश्‍वास ठेवायला हवा…
मागे एकदा वाचले होते वृत्तपत्रात की नववीतल्या मुलाला सर रागावले. अपमान झाला म्हणून घरी येऊन फाशी घेतली ..पण त्या आई-बापाचा टाहो त्याने ऐकला असेल का..जिने नऊ महिने पोटात वाढवले, रात्री पहाटे उठून दूध पाजले, मोठे केले…तिच्या कष्टाचे मोल असे फेडतात का ?
घरातले सततच्या वादाला मैत्रिणीने आत्महत्या केली, पण मागे लेकरांचा टाहो तिने ऐकला असेल का..मुलं आईविना कशी मोठी होतील, कोण माया लावेन, हा प्रश्‍न तिला पडला नसावा का?
शेतीत सतत अपयश, कुणाला व्यवसायात अपयश, कर्जबाजारीपणा वाढला म्हणून एकाने स्वतःला संपवून मुक्ती मिळवली. पण बायकोपोरांचा विचार यायला हवा ना…त्यांनी कुणाकडे बघायचं..! जगायचे तर शेवटपर्यंत सोबतीनेच जगावे मग कितीही संकट येवो…
यासाठी कुटुंबात पती-पत्नीने एकमेकांना भरपूर प्रेम, विश्‍वास, मानसिक, शारीरिक, भावनिक सर्व स्तरावर आधार दिला पाहिजे तेव्हाच आयुष्यातील कुठलेही वादळ सहज पार होऊन जाईन..आणि असे विचार मनात येणार नाही …नाहीतर कुणामुळे कुणीतरी जग सोडून जावं एवढं जगणं कठीण होऊन बसतं…! आणि आयुष्यभर आपराधीपणाची सल मनात रहाते …की जाणार्‍याला वाचवायला हवे होते… पण कुठे कमी पडतात प्रयत्न हे वेळ गेल्यावर विचार करून उपयोग नसतो कारण मागच्यांना पुढचा संघर्ष अटळ असतो.
आपण भूतलावर जगायला आलेलो असतो…ते जगून दाखवणं खरं यशस्वी खंबीर मनाचं लक्षण असतं…!
सुखी ठेवा, सुखी रहा, आनंद द्या, आनंद घ्या, अशीच विचारसरणी असावी..समजूतदारपणा आणि संयम, शांतता सतत सोबत ठेवावी..तेव्हाच दुःखाची तीव्रता कमी होत सुख आयुष्यात पाणी भरेन हे नक्की..!
सविता दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *