त्र्यंबकेश्वरला सलग सुट्ट्यांमुळे अलोट गर्दी
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
श्रावण महिना, स्वातंत्र्यदिन, पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी पर्वकाळ एकाच वेळी आल्याने त्र्यंबकनगरीत भाविकांचा महापूर आला आहे. मात्र, प्रशासकीय नियोजनाचा बोजवारा उडाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील संभाव्य गोंधळाची ही पूर्वसूचना ठरत आहे.
नाशिक-त्र्यंबक महामार्गावर चार ते पाच तासांची वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याचे रेंगाळलेले काम, चिखल, खोदलेले रस्ते आणि खड्डे यांमुळे दुचाकीस्वार घसरून जखमी होत आहेत. शहरात राहण्यासाठी खोल्या शिल्लक नसल्याने अनेक भाविकांनी पूर्व दरवाजातील मंडपात किंवा गोदावरी तीरावर मुक्काम ठोकला. पूर्व दरवाजातील दर्शनबारीचे टोक स्वामी समर्थ गुरुपीठापर्यंत (सुमारे दोन किलोमीटर) पोहोचले आहे. अस्वच्छ परिसर आणि पावसाच्या पाण्यात अनवाणी पायांनी 2 ते 3 तास एकाच जागेवर ताटकळल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाविकांना मोफत दर्शनासाठी 8 ते 10 तास लागतात, तर मंदिर प्रशासन पेड दर्शन (200 व 2500 रुपये) आणि व्हीआयपी दर्शनात मग्न आहे. गर्भगृहाच्या नैवेद्यासाठी दररोज तीन वेळा 30 ते 40 मिनिटे दर्शन बंद ठेवले जात असल्याने रांगेत थांबलेल्या भाविकांचे हाल होत आहेत.
स्थानिकांच्या मागण्या अन् उपाययोजना
भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर 24 तास उघडे ठेवावे. व्हीआयपी, गर्भगृह दर्शन आणि देणगी दर्शन (पेड दर्शन) पूर्णपणे बंद करून केवळ एकाच पूर्व दरवाजाने सर्वसामान्य भाविकांना दर्शन द्यावे. गर्भगृहाचा दरवाजा बंद राहण्याचा वेळ कमी करावा. क्षमतेपेक्षा जास्त भाविक शहरात येणार नाहीत यासाठी सक्तीचे नियम आणावेत. सलग सुट्ट्यांच्या दिवशी मंदिर दर्शन व इतर धार्मिक विधी स्थगित ठेवण्याचा विचार व्हावा. खंबाळा व इतर बाह्य पार्किंग क्षेत्र तत्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करून वाहनांचा ताण कमी करावा.
Massive crowds at Trimbakeshwar due to consecutive holidays.