श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू लागते. क्षणात मोत्याच्या सरी तुटून धरतीवर विखुरल्या जातात, तर क्षणात पिवळसर रविकिरणांचे दर्शन होते. ऊन-सावलीच्या लपंडावातून नभाला इंद्रधनूचे बांध घातले जातात. श्रावणाची किमया दाखवण्यासाठी दरी, डोंगर, झाडे, वेली नवख्या रूपात दिसू लागतात. श्रावणात मिळालेले अलंकार परिधान करून ते सुशोभित होतात. सण-उत्सवांचे स्वागत करण्यासाठी… सजीवांच्या मरगळलेल्या मनाला नवीन उभारी देतात… सारी निसर्गसृष्टी तयारच असते श्रावणाची जादूगिरी दाखवण्यासाठी.
श्रावणमासात भगवान शंकराची उपासना केली जाते. या मासात व्रतवैकल्ये, सण, उत्सवांना आरंभ होतो. मनोभावे भगवान शंकराची उपासना केली जाते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही आपली परंपरा आहे, जी आपण पुढे नेत आहोत. सार्या देवालयात भक्तांची मांदियाळी जमलेली असते. भगवंताच्या नामस्मरणाचा एकच जयघोष होतो. परमेश्वराविषयी आस्था, आपुलकी ही प्रत्येकाच्या मनात असते; परंतु काही तरुण देवाची उपासना किंवा भक्तीविषयी वेगळी मतं मांडतात. असे भक्ती-विचार संतांनीदेखील मांडले. ईश्वर सर्वथा एकच आहे. तो परम दयाळू आहे. भक्ती चळवळीतील विख्यात संत कबीर यांनी सत्याला ईश्वर मानले. सत्य म्हणजेच आपल्या सभोवतालची स्थिती. असलेल्या स्थितीत योग्य कार्य करणे म्हणजेच कर्म मानता येईल. कधी परमेश्वरप्राप्तीसाठी उपासना, साधना करण्यापेक्षा परमेश्वर आपल्या सभोवताली सामावलेला आहे, असा भाव मनात ठेवून प्रत्यक्ष कृती व मानवी सेवेला प्राधान्य दिल्यास त्यातून येणारा अनुभव हा सुखानुभूतीचाच असतो.
एका बाजूला देवाला दूध अर्पण करण्यात आपली भक्ती आहे. दुसर्या बाजूला अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. गरजूंना अन्न देणे त्यात आपले कर्म आहे व त्यातही परमेश्वर भक्ती आहे. म्हणून परमेश्वर फक्त मंदिरात न शोधता तो आपल्या सभोवतालीही पारखता यावा.
आपणही कर्मात ईश्वर मानावे. म्हणजे केलेल्या कार्यातून दुसर्याला दिलेले सुख हे अप्रत्यक्ष आपल्याकडेच परत येत असते. आपण केलेल्या कर्माच्या फळ स्वरूपात भगवंताची उपासना करायला हवी. त्यातून ध्यान साध्य होते. ध्यान, मनन, चिंतन या आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणार्या शक्ती आहेत. त्यावेळी आपल्यासोबत एक परमेश्वररूपी शक्ती आहे, ती आपल्या पाठीशी आहे. यावेळी आपले मनोबल वाढते. सकारात्मक विचार आपल्या मनात ठामपणे तयार होतात आणि अडचण काळात विचारपूर्वक निर्णय घेण्यास आपण सामर्थ्यशाली होतो. योग्य कृती करण्यासाठी कठीण वाटणार्या कार्याकडे वाटचाल करतो. भक्ती, उपासना करण्यासाठी मनुष्य केंद्रस्थानी असेल तर ती उपासना परमेश्वरापर्यंत पोहोचतेच. तेच आपले उत्तम कर्म बनू शकते. म्हणून भगवद्गीतेत तिसर्या अध्यायात कर्मयोगातून कर्माचे महत्त्व विशद केले आहे. सण-उत्सव जपणे आपले कर्तव्य आहे. यातून आपली संस्कृती टिकते. संस्कार रुजत जातात. एका बाजूला परमेश्वर भक्ती, उपासना आहे. दुसर्या बाजूला मानवी जीवनात सत्य, कर्म हेही महत्त्वाचे आहे. दोन्ही पारडे समान ठेवल्यास त्यातून प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती होऊ शकते. कधी मूर्ती पूजेतून, तर कधी मानवी पूजेतून श्रावण सफल व्हावा, अशी प्रार्थना करूया.
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…