म्हणे आम्ही मन मारतो?

 

ती एक मधल्या वयातली सँडविच पिढीतील पन्नाशी उलटलेली स्त्री..जिला नेहमीच दोन्ही पिढ्यांचे मन राखावे लागत असते..तिलाही त्या गोष्टीची इतकी काही सवय होऊन गेली आहे की, ती स्वतःला त्यातून मुक्त करूच शकत नाही..आपण आखलेल्या रिंगणात आपणच अडकून जावे त्यागत ती संसाराच्या अक्षाभोवती फिरत राहते..आयुष्याबद्दल फार काही तक्रार करायला उसंत तर हवी..?
एकदा तिने होळी सणानिमित्त आवडीने पुरणपोळीचा बेत आखला..आपण रांधलेले घरातल्या व्यक्तींनी आवडीने खावे असे प्रत्येक गृहिणीला वाटत असते.. तिची नवविवाहित सून म्हणाली की, माझा मूड नाहीये पुरणपोळी खाण्याचा मम्मी..मला आज पिझ्झा खायचा आहे आणि मी तो बाहेरून मागवला आहे..तिला क्षणभर खूप वाईट वाटले..समजावूनही सांगावेसे वाटले, पण त्यातले ती काहीच करू शकली नाही..सुनेचा अवकाश कसा हिरावून घेणार..? तिला वाटले तसे ती करणार..हेच स्वातंत्र्य तिला तिच्या काळात नव्हतेच आणि मुळात तिला ते स्वातंत्र्य असायला हवे असे पण वाटत नसे..मनावर संस्काराचा पगडा जो अजूनही आहेच..तिचा तेव्हाचा पहिला होळी सण आणि पुरण न जमल्याने झालेली घालमेल सारे सारे काही आठवले..सणवार परंपरा तसेच वडीलधार्‍यांचा मानपान मग त्यात स्वतःसाठी वेळ काढणे तसे अवघडच..मनाचे ऐकायला वेळ तरी कुठे असायचा..मनाने ती तिकडे विरघळून गेली होती..तिशीतल्या सूनबाईला आपण सणाच्या दिवशी बाहेरून मागवत आहोत याबद्दल काही वैषम्य वाटत नव्हते..सहज सून आपल्या नवर्‍याला म्हणाली की, मला माझे मन मारायला आवडत नाही..आणि मी माझे मन कधी मारतच नाही..ते बोलणे ऐकून सासूला वैषम्य वाटले, पण ती गप्पच होती.

हे ही वाचा: महिला वारकऱ्यांना मिळणार या सुविधा

लहानपणापासूनच मनात आले की, नेहमीच स्वतःच्या मनाप्रमाणे वागत आलेली सून मग मन मारायचा प्रश्‍न येतोच कुठे? आता आता तर त्यांचे आयुष्य सुरू झाले आहे..अजून आयुष्याचा उभा डोंगर चढायचा आहे..अनुभव घ्यायचे आहेत. त्यातून तावून सुलाखून निघायचे आहे..सगळेच काही मनासारखे मांडून ठेवलेले असते असेही नाही..आणि आता इथे सासरी तर सारे काही आलबेल, मनमुक्त, मनमौजी आणि मग उगाच असे गळे का काढायचे..?
मन मारणे या शब्दावरून मी आजूबाजूला सफर करून आले..हेवा करणार्‍या काही लोकांना आपली लायकी नसताना आजूबाजूच्या लोकांचे पाहून तुलना करायची सवय असते, पण त्या नादात हे लक्षात येत नाही की त्या व्यक्तीच्या यशामागे त्याची कणखर अशी मनोभूमिका आहे..अपार कष्ट आहेत तेव्हा कुठे त्याला यशाचा कळस लाभलेला असतो..जगाला मात्र केवळ हिमालयाचा कळस दिसत असतो..आपण एखाद्या गोष्टीवर अपार लक्ष केंद्रित करत असतो तेव्हा जीवनाशी आवश्यक असलेल्या काही गोष्टी नक्कीच दुर्लक्षित होत असतात अगदी कळत-नकळतपणे..मग मनात असूनही त्या काही गोष्टींना वेळ देता येत नाही तिथे एक वेळ मन मारणे असा शब्दप्रयोग आपण करू शकतो; परंतु आताची मुक्तअशी चंगळसंस्कृती बघता ‘मचल जी ले अपनी जिंदगी’ म्हणत सतत स्वतःला सूट देत राहणं कितपत बरोबर आहे..सतत स्वतःला एका कम्फर्ट झोनमध्ये ठेवत गेलो तर त्या झोनची म्हणजे आरामदायी कोषाची सवय होऊन जाते आणि त्यातून बाहेर येणे अवघड होत जाते..

बदलत्या काळात आयुष्याचा झंझावाती वेग पाहता आहे तो क्षण समरसतेने जगायला हवा हेही पटतंय, पण त्या नादात एकदम प्रवाहपतित होऊन कसे चालेल..? जसे सुंदर कळीचे फुलात रूपांतर होताना काही टप्पे असतात आणि मगच त्या फुलाचा आनंद घेता येतो..वादळ वार्‍याशी झुंज द्यावी लागते..आयुष्यातही असे टप्पे असतात आणि ते समरसून जगायचे असतात..सगळे काही मनासारखे असते असेही नाही..त्याला मन मारणे असेही म्हणून चालत नाही..आजच्या वेगवान स्मार्ट पिढीला हे सर्व समजावून कसे सांगावे हा एक प्रश्‍नच आहे..झटपट सुखाच्या कल्पना आणि भोगवादाकडे झुकणारी तरुणाई ज्या गोष्टीला अंतच नाही..मन कधी मारायचे नाही, असे म्हणत फक्त मस्तीत जगायचे..मग मनही कोडगे होत जाते..लहानसहान गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही.

स्वाती पाचपांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *