अल्पसंख्याक; भारतीय उपखंडातील!

कटाक्ष

जयंत माईणकर

इम्रान प्रतापगढी या उत्तर प्रदेशातील शायर व्यक्तीला कॉंग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण लोकसभा आणि विधानसभेतील मुस्लिम खासदार, आमदारांची घटती संख्या.
2014 मध्ये मुस्लिम खासदारांची संख्या होती 23. स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतके कमी मुस्लिम खासदार निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असावी. 2019 ला ही संख्या 27 वर पोहोचली. सध्या देशात सुमारे 20 कोटी मुस्लिम असून, त्यापैकी सुमारे 90 टक्के मतदार आहेत.

मागच्या चार लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली असता, सर्वाधिक मुस्लिम उमेदवार 2004 मध्ये विजयी झाल्याचे दिसते. 2004 च्या निवडणुकीत 34 मुस्लिम उमेदवार, 2009 मध्ये 39. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात सर्वांत जास्त मुस्लिम खासदार 1980 मध्ये बनले होते. त्या वेळी मुस्लिम खासदारांची संख्या होती 49. हिंदुत्व या शब्दाला ‘राम मंदिर’ आंदोलनामुळे धार चढल्यापासून मुस्लिम खासदारांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आणि 2014 ला ती चक्क 23 ला पोचली. 1989 ला 86 जागा जिंकलेला भाजप 2014 ला 282 वर पोचला आणि मत विभाजनाच्या भरवशावर भाजप वाढत गेला. मला 1996 ची यवतमाळची निवडणूक आठवते. 1952 पासून सतत कॉंग्रेस उमेदवार निवडून देणार्‍या या मतदारसंघात स्व. उत्तमराव पाटील यांना उमेदवारी नाकारून कॉंग्रेसने गुलाम नबी आझाद यांना उमेदवारी दिली. आझाद दोन वेळा बाजूच्याच वाशिम मतदारसंघातून निवडून आले होते. पण घडलं उलटच. भाजपने एक प्रचार तंत्र जिल्ह्यात वापरलं. मतदारांना एक संदेश पसरविला गेला. ‘तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे की अफझल खान’…

आणि भाजपचे राजाभाऊ ठाकरे निवडून आले. 1998 ला कॉंग्रेसने पुन्हा उत्तमराव पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. मुस्लिम उमेदवार कॉंग्रेसने दिला की त्या मतदारसंघात भाजपच्या हिंदुत्वाला धार चढते, हा इतिहास! यात अहमद पटेल यांच्यासारख्या दिग्गजाचाही भरूच मतदारसंघात बळी गेला. एकप्रकारे कॉंग्रेसने मुस्लिम उमेदवार देणं म्हणजे भाजपचा विजय नक्की करणं. त्यामुळे मुस्लिम उमेदवारांना राज्यसभेचा किंवा विधान परिषदेचा मार्ग जाणीवपूर्वक दिला जातो.कारण त्याच्याच भरवशावर अल्पसंख्याक समाजाची हमखास मिळणारी गठ्ठा मते मिळविता येतात. 2018 मध्ये तेव्हा विधान परिषदेचे उपसभापती असलेल्या माणिकराव ठाकरे यांना विधान परिषदेची अपेक्षित उमेदवारी न देता त्यांच्या जागी वजाहत मिर्झा यांची वर्णी याच कारणासाठी लावली गेली. मिश्र वंशीय लोकशाहीवादी देशात जेव्हा बहुसंख्याक धार्मिक, वांशिक, भाषिक मुद्यावर एकत्र येतात तेव्हा अल्पसंख्याक निवडून येण्याची शक्यता कमी होते.

भारतात घडणार्‍या घटनांचे पडसाद अखंड भारतातील पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतही घडतात. जसं भारतात 100 कोटी हिंदू आणि 20 कोटी मुस्लिम आहेत. पाकिस्तानची सध्याची लोकसंख्या सुमारे 23 कोटी असून, त्यातील 20 कोटी मुस्लिम आहेत. जसं भारतात हिंदूंच्या खालोखाल मुस्लिम धर्माचा समावेश लोकसंख्येनुसार लागतो. तसाच पाकिस्तानमध्ये मुस्लिम धर्माच्या खालोखाल अल्पसंख्याक म्हणून हिंदू धर्माचा नंबर लागतो. हिंदू समाज आजही पाकिस्तानमध्ये 45 ते 50 लाखांच्या आसपास आहे. तर अनधिकृत आकडेवारीनुसार ही संख्या 80 लाख ते एक कोटीच्या दरम्यान आहे. तर 20 ते 50 हजारांच्या आसपास शीख धर्माचे लोक राहतात. बांगलादेशची लोकसंख्या सुमारे 15 कोटी असून, सुमारे 1.25 ते 1.5 कोटी हिंदू जनसंख्या आहे. जसा भारतात प्रमुख अल्पसंख्याक धर्म मुस्लिम आहे तसाच पाकिस्तान आणि बांगलादेशातील प्रमुख अल्पसंख्याक आणि बांगलादेशातील प्रमुख अल्पसंख्याक धर्म हिंदू आहे.

अल्पसंख्याक समाज जगात कुठल्याही लोकशाहीवादी देशात गठ्ठा मतांसाठी जाणला जातो. आणि हा समाज आपल्याला सुरक्षा, प्रतिनिधित्व पक्षाकडे झुकलेला असतो. ही वास्तविकता अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्व लोकशाहीवादी देशात सारखी आहे. आणि म्हणूनच अमेरिका, इंग्लंडमधील भारतीय मुख्यत्वे डेमोक्रेटिक आणि लेबर पक्षाला अनुकूल असतात. भलेही ऋषी सूनक हे भारतीय वंशाचे नारायण मूर्ती यांचे जावई सध्या इंग्लंडचे कॉंझरवेटिव्ह पक्षाचे अर्थमंत्री असतील.
भारतीय उपखंडातील तीनही देशांतील अल्पसंख्याकसुद्धा आपल्याला सुरक्षा आणि प्रतिनिधित्व देणार्‍या पक्षाला जवळ करतात. या तीनही देशांत एकसारखेपणा आहे. या तीनही देशांत अल्पसंख्याकांनी पारिवारीक पक्षालाच जवळ केलेले आहे. भारतात आजही मुस्लिम समुदाय नेहरू-गांधींच्या नेतत्वाखालील कॉंग्रेसला अनुकूल आहे. आणि म्हणूनच या पक्षावर मुस्लिमांचा अनुनय करण्याचा आरोप भाजपद्वारे केला जातो.

तर पाकिस्तानमध्ये हिंदूंसाठी हीच जागा भुट्टो परिवाराच्या पाकिस्तान पीपल्स पक्षाची आहे तर बांगलादेशमध्ये हीच जागा शेख मुजिबुर रहमान प्रणीत अवामी लीग या पक्षाची आहे. बेनझीर पुत्र बिलावल यांचा पाकिस्तानातील शंकराच्या मंदिरात अभिषेक करतानाचा फोटो चांगलाच गाजला होता. तर 1971 ला शाळकरी असलेल्या बेनझीर आपले वडील झुल्पिकर अली भुट्टो यांच्याबरोबर सिमला कराराला हजर होत्या. फ्रॉक घातलेल्या बेनझीर यांची छायाचित्रे आजही पाहायला मिळतात. शेख हसीना या आपल्या कुटुंबाच्या हत्याकांडातून वाचू शकल्या कारण तेव्हा त्या दिल्लीत शिक्षणासाठी होत्या.

हिंदूंबहुल भारतात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यापासून डॉ. झाकीर हुसेन, एपीजे अब्दुल कलाम, अहमद पटेल यांच्यासारख्या मुस्लिम नेत्यांची मांदियाळी दिसते, तशी जरी नाही तरीही काही प्रमाणात या दोन्ही देशांत हिंदू नेतृत्व दिसते. पाकिस्तानमधील अमरकोट किंवा उमरकोट या हिंदूबहुल आणि हिंदू लोकप्रतिनिधी असलेल्या भागात आजही करणी सिंग सोधा या नावाचं नेतृत्व दिसतं. त्यांचे वडील राणा चंद्रसिंग हे पाकिस्तानात चक्क सात वेळा खासदार होते आणि भुट्टो मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा होते. पुढे त्यांनी पाकिस्तान हिंदू लीग या नावाच्या केसरी रंगाचा ध्वज असलेल्या पक्षाची स्थापना गेल्या दशकात केली. अर्थात भारतात जसा मुस्लिम लीग आहे तसेच पाकिस्तानमध्ये हिंदू लीग! अमरकोटचं महत्त्व यासाठी की येथील किल्ल्यात अकबराचा जन्म झाला होता. करणी सिंगची पत्नी जयपूरच्या कानोटा (जयपूर) येथील ठाकूर मानसिंहच्या मुलीशी लग्न केलं आहे. त्यांचा मुलगासुद्धा मंत्री होता. भारतात ज्याप्रमाणे टिळा लावण्यासाठी भाजपसारख्या उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी पक्षात एक -दोन मुस्लिम नावं असतात, तशाच प्रकारची हिंदू नाव आपल्याला पाकिस्तानातील प्रत्येक पक्षात राजकीय पक्षात सापडतील. या पक्षात मंगला शर्मा नावाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधी आहेत. तर महेश कुमार मालानी आणि कृष्णा कुमारी यासारखे ही नाव पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये सापडतात. कृष्णा कुमारी कोहली या दलित असून, सिनेट अध्यक्षाच्या गैरहजेरीत त्या अध्यक्ष होत्या आणि त्याचवेळी पाकिस्तान सिनेटने भारताच्या ताब्यातील काश्मीरविषयी ठराव पारित केला होता. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात झाली होती.
दिलीप बरूआ या नावाचे कम्युनिस्ट नेते बांगलादेशचे उद्योग मंत्री होते. 2018 मध्ये झालेल्या बांगलादेश संसदेच्या निवडणुकीत चक्क 17 हिंदू उमेदवार निवडून आले होते. यात महिलांचाही समावेश आहे.

भारतात ज्याप्रमाणे संघ भाजपद्वारे हिंदुत्वाचा प्रचार केला जातो त्याच प्रकारे मुस्लिम लीग किंवा इतर कट्टर पंथी पक्षाद्वारे इस्लामचा प्रचार केला जातो. बाबरी मस्जिद, गोध्रा दंगल यांसारखे प्रकार पाकिस्तान, बांगलादेशातही घडतात. सोबतीला जबरदस्तीच्या धर्मांतराचाही आरोप केला जातो. आणि अर्थात अशा घटना भारतीय उपखंडाच्या या तीनही देशांत घडतात. पण लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात जसे मुस्लिम अल्पसंख्याक तसेच पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक. तीन देश मिळून शंभर ते 102 कोटींच्या आसपास हिंदू लोकसंख्या आहे, तर सुमारे 55 कोटी मुस्लिम. अर्थात निवडून येण्यासाठी या तीनही देशांत अल्पसंख्याकांची मते महत्त्वाची ठरतात. आणि ज्या पक्षाला अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात मतदान करतात त्या पक्षावर इतर पक्ष अल्पसंख्याकांच्या अनुनयाचा आरोप करतात. आणि हा आरोप नेहमी बहुसंख्याक धर्माधिष्ठित पक्षाकडून केला जातो. हे अयोग्य असलं तरीही हा सल्ला कोणाला देणार? समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी भारत – पाक संघराज्य याचा विचार मांडला होता 1960 च्या दशकात. पुढे 1989 ला जर्मनी एक झाला, मात्र युगोस्लाव्हियाचे सात तुकडे पडले. पाकिस्तान दोन भागात विभागला गेला. बांगलादेश झाला. पण संघराज्याच्या विचार कागदावरच राहिला. तीनही देशांतील नेते या प्रस्तावावरची धूळ झटकतील? तूर्तास इतकेच!

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *