दिंडोरी तालुक्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून, संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. तालुक्यातील 50 हून अधिक गावे तसेच वणी आणि दिंडोरी शहराची तहान भागवणारे महत्त्वाचे ओझरखेड धरण 100 टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. खबरदारी म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पावसाचा जोर असाच राहिल्यास पुढील दोन-तीन दिवसांत इतर धरणेही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
सततच्या पावसाने धामण नदीला पूर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दिंडोरी शहरातील मुख्य पुलावरील वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दिंडोरी ते पालखेड रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या पर्यायी रस्त्याची पावसाने दुरवस्था झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पालखेड धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून कादवा नदीपात्रात 2,052 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
या पावसामुळे टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारख्या पिकांना आणि नुकत्याच झालेल्या पेरण्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, नद्या-नाल्यांना आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यात उतरणे टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Ozharkhed Dam Overflows